shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई इंडियन्स, आरसीबीचे विजय ; रोहितच्या बॅटचा सत्याग्रह सुरूच !



                    विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १७.३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १७५ धावा करत सामना जिंकला. आरसीबीसाठी सॉल्टने ३३ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या, तर कोहलीने ४५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. याशिवाय प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलने २८ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. 

                    आरसीबी या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून आला होता. हा संघ प्रत्येक मोसमात किमान एक सामना हिरव्या जर्सीत खेळतो. वास्तविक, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगळुरू संघ हिरवी जर्सी घालून खेळतो. हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीचा विक्रम काही खास नाही, पण राजस्थानविरुद्ध विजय नोंदवण्यात यश आले. आरसीबीचा ग्रीन जर्सीतील हा पाचवा विजय आहे. हिरवी जर्सी परिधान करताना त्याने राजस्थानला दोनदा पराभूत केले आहे. 

                   आरसीबीच्या विजयामुळे गुणतालिकेत बदल झाला असून गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स पाचव्या स्थानावर घसरला आहे. आरसीबी सहा सामन्यांत चार विजय आणि दोन पराभवांसह आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थाननेही सहा सामने खेळले असून दोन विजय आणि चार पराभवांसह चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. 

                   विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सॉल्ट आणि कोहलीने आरसीबीला वेगवान सुरुवात करून दिली कारण पॉवरप्ले मध्येच संघाने ६० धावांचा टप्पा पार केला. कोहली आणि सॉल्टने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीला सहा षटकात बिनबाद ६५ धावांपर्यंत मजल मारली. सॉल्टने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे अर्धशतक २८ चेंडूत पूर्ण केले. कोहली आणि सॉल्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी झाली जी कुमार कार्तिकेयने सॉल्टला बाद करून तोडली.

                   तत्पूर्वी यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात संथ होती. यशस्वी आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात चांगली भागीदारी झाली, मात्र क्रुणाल पांड्याने सॅमसनला बाद करून राजस्थानला पहिला धक्का दिला. सॅमसन १९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १५ धावा करून बाद झाला.

                   त्यानंतर यशस्वी आणि रियान पराग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या पण यश दयालने रियानला बाद केले. रियान २२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा करून डग आऊटमध्ये परतला. यशस्वीने सामन्यात शानदार फलंदाजी करत मोसमातील दुसरे अर्धशतक झळकावले. एका टोकाकडून यशस्वी डाव सांभाळत होता, मात्र हेजलवूडने यशस्वीला एलबीडब्ल्यू करत राजस्थानला तिसरा धक्का दिला. यशस्वीने शानदार फलंदाजी करत ४७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या.  


                     शिमरॉन हेटमायरला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही आणि तो भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. शिमरॉन नऊ धावा करून बाद झाला. सरतेशेवटी, ध्रुव जुरेलने शानदार फलंदाजी केल्याने राजस्थानला १७० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. जुरेलने २३ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा केल्या. नितीश राणा एका चेंडूवर चार धावा करून नाबाद राहिला. आरसीबीतर्फे भुवनेश्वर, यश दयाल, जोश हेझलवूड आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

                    सॉल्ट बाद झाल्यानंतर कोहलीने पडिक्कलसह डाव पुढे नेला आणि धावगती कमी होऊ दिली नाही. यावेळी कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. टी२० मध्ये शंभर अर्धशतके करणारा तो पहिला भारतीय ठरला. आयपीएलच्या या मोसमातील कोहलीचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्याने पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी केली. पडिकलने या काळात आरसीबीसाठी १००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू आहे. राजस्थानकडून कार्तिकीने एकमेव विकेट घेतली तर इतर गोलंदाज रिकाम्या हाताने राहिले.                       सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्मा (५९), रायन रिकेल्टन (४१) आणि सूर्यकुमार यादव (४०) यांच्या खेळीमुळे मुंबईने २०५ धावा केल्या. नमन धीरने ३८ धावांचे योगदान दिले. कुलदीप आणि विप्रराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले. सलग चार विजय मिळविणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची विजयी मालिका अखेर संपुष्टात आली. मुंबई इंडियन्सने दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला. शेवटी दिल्लीचे तीन फलंदाज धावबाद झाले आणि सामना गमावला.

                   मुंबईच्या २०६ धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीचा डाव १९ व्या षटकात १९३ धावांवर आटोपला. १९ व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन फलंदाज धावबाद झाले आणि दिल्लीने १२ धावांनी सामना गमावला. दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर जॅकला बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला.

                   मात्र, तीन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने ४० चेंडूत ८९ धावांची झटपट खेळी करून सामना दिल्लीच्या बाजूने केला, पण सँटनरने नायरची विकेट घेतली आणि कर्ण शर्माने केएल राहुल आणि अभिषेक पोरेलचे बळी घेत सामना मुंबईच्या बाजूने वळवला. नंतर अभिषेक शर्मा धावबाद झाल्याने दिल्लीच्या आशा पल्लवित झाल्या. कर्णने तीन आणि सँटनरने दोन बळी घेतले.

                 तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या पाच षटकांत ४७ धावा जोडल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज झटपट डग आऊटमध्ये परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची धुरा सांभाळत अर्धशतकी भागीदारी केली. सूर्याचे अर्धशतक हुकले, पण तिलकने ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. याशिवाय नमननेही उपयुक्त ३८ धावांची भर घातली. निर्धारित २० षटकांत मुंबई इंडियन्सने ५ गडी गमावून २०५ धावा केल्या.

                 मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने बारा चेंडूत अठरा धावा केल्या आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विपराज निगमने त्याला बाद केले. त्याच्या कामगिरीने चाहते पुन्हा एकदा निराश झाले. रोहित आऊट होताच मैदानात शांतता पसरली होती.

                वेगवान गोलंदाज अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजांनी जबाबदारी स्विकारली. विपराज निगम आणि कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीने मुंबईच्या मधल्या फळीचा कणा मोडला आणि धावगती नियंत्रित केली. मिचेल स्टार्क आणि मुकेश कुमार यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा केला नाही, परंतु कर्णधार अक्षर पटेलच्या चतुरस्र नियोजनामुळे संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. कुलदीप आणि विपराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

                  रोहित शर्माचा टी२० मध्ये खराब फॉर्म कायम आहे. विद्यमान सत्रात अद्याप त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झालेली नाही. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध काही खास करू शकला नाही. यूपीच्या विपराज निगमच्या चेंडूने तो फसला.

                  विराट कोहलीनंतर रोहित शर्माची विकेट घेण्याचा अप्रतिम पराक्रम विपराज निगमने आपल्या पहिल्याच सत्रात केला. एकीकडे चाहते विपराजला जायंट किलर म्हणत असताना दुसरीकडे चाहते रोहितला नो -हिट मॅन म्हणत टीका करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १८ धावा करून तो बाद झाला.  यावरूनच रोहितचा फॉर्म ठरवता येईल. एवढेच नाही तर रोहित शर्माचा फॉर्मही मुंबई इंडियन्ससाठी मोठी समस्या बनला आहे. कारण संघ त्याला बाहेरही ठेवू शकत नाही. या हंगामात रोहित शर्माने मुंबईसाठी ५ सामने खेळले आहेत आणि ११.२०  च्या सरासरीने फक्त ५६ धावा केल्या आहेत, ही रोहितच्या क्रिकेट शैलीचा विचार करता अत्यंत खराब कामगिरी आहे.

                    हे लक्षात घेण्यासारखे आहे की रोहित शर्मा आयपीएल २०२३ पासून लेग स्पिन गोलंदाजाविरुद्ध आठ वेळा बाद झाला आहे. याशिवाय रोहित अनेक वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे, जी त्याच्यासाठी मोठी समस्या बनली आहे. २०२३ पासून आयपीएलच्या जवळपास २५ डावांमध्ये रोहित शर्माची सरासरी २४.३९ आहे. सलामीवीराची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी सरासरी आहे.

                    मागच्या जूनमध्ये टी२० चे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यामुळे रोहित फक्त टी २०ची आयपीएल खेळत आहे, पण तिच्यातही तो बॅटची कलाबाजी विसरला असल्याचे दिसून येते. उर्वरीत सामन्यात अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या सत्रात मुंबईच काय कोणतीही फ्रँचायची त्याला खरेदी करण्यास जाणीवपूर्वक विसरतील. रोहितच्या याच अपयशामुळे मुंबई इंडियन्स सहा सामन्यात केवळ दोनच सामने जिंकले आहे. त्याचा परिणाम गुणतालिकेत मुंबई तळाला गेले आहे.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close