shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर : निलोफर रज्जाक पठाण.

स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर : 
निलोफर रज्जाक पठाण.
हजारो वर्ष ज्यांनी शस्त्र परजले आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही ,बाबा तुम्ही फक्त एक पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला.... खरंतर या एका वाक्यातच बाबासाहेबांचं वेगळेपण काय हे लक्षात येतं. भीमराव पासून ते महामानव पर्यंतचा अतिशय खडतर प्रवास बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब जन्मले त्यावेळी अस्पृश्य समाजाची परिस्थिती अतिशय भयावह अशी अवस्था त्यांची होती. बाबासाहेब जन्मले ते कबीर पंथीय, अतिशय कडक शिस्तीचे घराणे ,प्रखर संघर्षातून बाबासाहेब कार्य करत राहिले. शाळेत जायचे त्यावेळेस वर्गाबाहेर पोत्यावर बसून शिक्षण घ्यायचे. शाळेत पाणी पिण्याचा देखील अधिकार नव्हता, पुस्तक नव्हते ,फळ्यावर गणित दिली जायची ती ज्याला सोडवायला येत होती पण त्याला फळ्याला शिवण्याचा अधिकार नव्हता कारण खडूला स्पर्श झाला तर त्याचा स्पर्श फळ्याला होईल ,फळ्याचा स्पर्श त्या पाठीमागे असलेल्या डब्याला होईल डब्याचा स्पर्श त्यातील असलेल्या अन्नाला होईल आणि वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अन्न विटाळ होईल. परंतु जेथे शिकण्यासाठी ज्या बाबासाहेबांना पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी असे एक पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर आज संपूर्ण भारत देश चालत आहे. बाबासाहेब पत्रकार होते , चांगले विद्यार्थी होते ,वकील होते, चांगले चित्रकार होते, संत साहित्यिक होते, चांगले पती होते, शेतकऱ्यांचे, कामगारांचे भटक्या विभक्त जातीचे नेते होते, एस सी ,एस टी चे नेते होते आणि बाबासाहेब आम्हा स्त्रियांचे सुद्धा नेते होते. बाबासाहेबांच्या जीवनात त्यांच्या गुरुस्थानी अत्यंत प्रिय ऐतिहासिक व्यक्तिमत्व असणारे गौतम बुद्ध, कबीर, आणि महात्मा फुले होते. पुस्तक वाचण्याचा छंद तर होताच दहावीत जेव्हा प्रथम क्रमांक आला त्यावेळी त्यांचा सत्कार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना गौतम बुद्ध हे पुस्तक देऊन केला आणि ते पुस्तक वाचल्यावरच आज आम्हाला भारतीय राज्यघटनेचे पहिले शिल्पकार भेटले. बाबासाहेबांचे कार्य फक्त दलित स्त्रियांसाठी नव्हे तर समस्त महिला वर्गांसाठी बाबासाहेबांनी मोठे कार्य केले. खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक म्हणून बाबासाहेबांना ओळखले जाते. महिला सक्षमीकरणासाठी अथक परिश्रम करून हिंदू कोड बिल तयार करून ते संसदेत सादर करून पास करून महिलांसाठी सुरक्षा कवच तयार केलं ज्याच्यामुळे आज महिला स्वतंत्र फिरू शकते. पूर्वी घटस्फोट फक्त पुरुषांना मिळत होता, वारसा हक्क संपत्तीमध्ये फक्त पुरुषांना हक्क होता, तो बाबासाहेबांनी महिलांना मिळवून दिला. विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांमुळेच मिळाला. महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारा जगातील एकमेव पुरुष म्हणजेच बाबासाहेब. काम करणाऱ्या स्त्रियांना बाळंतपणाची रजा असली पाहिजे म्हणून मॅटरनिटी बेनिफिट अॅक्ट बाबासाहेबांनी अस्तित्वात आणले. समान कामासाठी समान वेतन ही तरतूद बाबासाहेबांनी आणली.हे व्यापक बाबासाहेब आम्हाला समजलेच पाहिजेत. 1927 ला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. 1942 च्या नागपूरच्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. बाबासाहेबांनी अखिल भारतीय संमेलन घेतले त्यावेळेस 25 हजार महिला त्या संमेलनासाठी उपस्थित होत्या. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक चळवळीत आवर्जून स्त्रियांना सहभाग घ्यायला लावले. लग्न ही मुलीच्या प्रगतीची अडचण असून ती मुलीवर लादली जाऊ नये तसेच लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण समान अधिकार असलेली सहचारिणी असावी गुलाम नसावी असं बाबासाहेबांचं मत होतं. स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी आपण ही पुढे यायला पाहिजे हा त्यांचा विचार. बाबासाहेबांचे खरंच स्त्रियांविषयीचे योगदान हे फार मोठे आहे महिला म्हणून आपण सर्व महिलांनी नेहमीच त्यांचे ऋणी असले पाहिजे. आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व महिला वर्गांना तसेच समस्त भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दसुमनांनी अभिवादन करते.

सौ. निलोफर रज्जाक पठाण 
पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 
उन्नती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष.
close