श्रीरामपूर / प्रतिनीधी:
श्रीरामपूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे तब्बल १० ते १२ माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असलेल्या या नेत्यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, अहिल्यानगर चे प्रभारी विजय चौधरी, अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या घडामोडींमुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, तसेच माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, आणि वळद उंबरगांव येथील सरपंच विराज भोसले यांचा समावेश आहे. हे सर्व नेते जयंत ससाणे यांच्या राजकीय वारशाचे समर्थक आणि काँग्रेसमध्ये प्रभावी स्थान राखून होते.
संजय फंड यांनी स्पष्ट केले की, शहरातील रस्ते, पाणी, घरकुल योजना तसेच अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. सत्तेच्या बाहेर राहून या समस्या सोडवता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. फंड यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सलग बैठका सुरू होत्या. अखेर या बैठकीतून भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. या प्रवेश सोहळ्यामुळे श्रीरामपूरमध्ये भाजपचा झेंडा आता अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक प्रभागात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होणार असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार आहे.
याबाबत माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी स्पष्ट केले की, हा पक्षप्रवेश सध्या केवळ शहर आणि नगरपालिका हद्दीत मर्यादित असून, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा यात समावेश नाही. विशेष म्हणजे, भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून आलेल्या या गटातील एखाद्या माजी नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. नुकतीच शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक झाली असून, लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
पक्षांतराबाबत करण ससाणे यांच्याशी कोणताही विरोध नाही असे स्पष्ट करत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शहराच्या विकासासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.” या राजकीय उलथापालथीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला लागलेला हा मोठा फटका त्यांच्या संघटनेवर आणि गटबाजीत परिणाम करणारा ठरू शकतो. श्रीरामपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी या प्रवेशामुळे झालेली आहे, हे निश्चित. या पक्ष प्रवेशावेळी , सोमनाथ गांगड, श्रीरामपुर पंचायत समिती उपसभापती सुनील क्षीरसागर,भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन दिगंबर फरगडे, शिरसगांवचे उपसरपंच वैभव लोढ़ा , दत्तात्रय धालपे, पराग शाह, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे, सागर बर्वे यांच्यासह श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी- कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
-------------------------------------------
"श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधा पूर्ण करणाऱ्या योजनांमुळे – जसे की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, १७८ कोटींची जलयोजना, जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी, सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना व टपरी धारकांचे पुनर्वसन या विकासगंगेचा भाग होण्यासाठी आणि श्रीरामपुर शहराच्या उज्वल भविष्यासाठी आज अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत!" – जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर
-----------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111