कोलकाता नाइट रायडर्सने अष्टपैलू खेळाच्या जोरावर गुरुवारी अठराव्या आयपीएल सत्रामध्ये सनरायझर्स हैद्राबादचा त्यांच्या घरच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर ८० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने कर्णधार अजिंक्य राहाणे, व्यंकटेश अय्यर, अंगकृष्ण रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या खेळीमुळे २० षटकांत ६ बाद २०० धावा केल्या. या धावसंख्येसमोर हैदराबादची तुफानी फलंदाजांची फळी फलंदाजी १६.४ षटकांत १२० धावांतच कोलमोडली.
एक वेळ कोलकाता १५० धावाही बनवणार नाही असे वाटत होते. परंतु त्यांनी शेवटच्या पाच षटकांत ७८ धावांची लयलूट केली. यामध्ये व्यंकटेश अय्यरने २९ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केलेल्या ६० धावांच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्याशिवाय रिंकू सिंगने १७ चेंडूत ३२ धावा केल्या. अंगकृश रघुवंशीने ३२ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. तर कर्णधार अजिंक्य राहाणेने एक चौकार व चार षटकारांनिशी ३८ धावा ठोकल्या. राहाणेच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला.
हैद्राबादचा या मोसमातील हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सने ३० मार्चला त्यांचा पराभव केला होता. तर २७ मार्चला लखनऊ सुपर जायंट्सने हैद्राबादमध्येच त्यांचा पराभव केला होता. कोलकात्याविरुद्ध मिळालेला हा पराभव आयपीएलमधील हैद्राबादचा सर्वात मोठा पराभव आहे.
हैद्राबादला विजयासाठी २०१ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे असलेली फलंदाजी बघता त्यांच्यासाठी ते अवघड वाटत नव्हते. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्याकडून झंझावाती खेळीची अपेक्षा होती. वैभव अरोराच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून हेडने कोलकात्याला घाबरवले पण पुढच्याच चेंडूवर तो हर्षित राणाकडे झेल देऊन बाद झाला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राणाने अभिषेकलाही परत पाठविले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या.
वैभवने ईशान किशनच्या खेळीला ब्रेक लावला. हा डावखुरा फलंदाज दोन धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. नितीश कुमार रेड्डीही आपला डाव १९ धावांच्या पुढे नेऊ शकला नाही. सुनिल नारायणने कामिंदू मेंडिसला बाद केले आणि हैद्राबादने पाचवा गडी गमावला. या सामन्यात अनिकेत वर्मालाही काही खास करता आले नाही. वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर तो सहा धावांवरच बाद झाला.
हेन्रिक क्लासेन एकटाच लढत होता, पण त्याचा डावही वैभवने पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपुष्टात आणला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने २१ चेंडूंत दोन चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावा केल्या. १५ चेंडूत १४ धावा करून कर्णधार पॅट कमिन्स वरुणचा बळी ठरला. त्यानंतर वरुणने सरजित सिंगला बाद करून हैद्राबादचा नववा गडी बाद केला. रसेलने हर्षल पटेलला बाद करून हैद्राबादचा डाव संपवला. कोलकाताकडून वैभव आणि वरुणने प्रत्येकी तीन बळी घेतले. रसेलने दोन गडी बाद केले. तर राणा आणि नारायण यांना प्रत्येकी एक यश मिळाले. आयपीएल लिलावात पावणे चोवीस कोटी रुपयांना विकला गेलेला व्यंकटेश अय्यर गेल्या तीन सामन्यांत केवळ नऊ धावा करू शकला आणि त्याच्यावर एवढा पैसा खर्च करण्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र अय्यरने हैद्राबादविरुद्ध शानदार फलंदाजी करून त्याची किंमत का मोजली गेली हे दाखवून दिले. हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टाकलेल्या १९ व्या षटकात अय्यरने तीन चौकार आणि एक षटकार खेचून २१ धावा केल्या.
अय्यरकडू धावांचा वर्षाव होत असताना रिंकू सिंगच्या बॅटमधूनही धावा आल्या. त्याने १७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३२ धावा केल्या. गेल्या मोसमापासून रिंकू फॉर्ममध्ये नव्हता. चालू मोसमात त्याने मागील तीन सामन्यांच्या दोन डावात केवळ २९ धावा केल्या होत्या. मात्र यावेळी संघ प्रबंधनानाने त्यांना यांगले खेळव्यास प्रवृत्त केले.
पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी या जोडीने कोलकाताला सुरुवातीचे धक्के दिले. कमिन्सने पहिल्याच षटकात यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकला (०१) बाद केले. यानंतर शमीने नारायणला सात धावांवर असताना परतीचा रस्ता दाखविला. कोलकाताने अवघ्या १६ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. तेथून कर्णधार अजिंक्य रहाणे (३८) याने युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी (५०) सोबत डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या शंभराच्या जवळ नेली. दोघांनी ८१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रघुवंशीने ३२ चेंडूत 50 धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या दोघांनंतर अय्यर आणि रिंकूने बाकीचे काम पूर्ण करून कोलकाताला २०० धावांवर पोहचविले.
कोलकाता नाईट रायडर्सने दहा वर्षांनंतर गेल्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकविले होते. याचे एक कारण होते संघाची सलामीची जोडी. सुनिल नारायण आणि फिल सॉल्ट या जोडीने भरघोस धावा करत संघाला सुरुवात करून दिली होती, ज्यामुळे संघ मजबूत झाला होता. संघाची सलामीची जोडी ही त्यावेळी संघाची ताकद होती. पण यंदाच्या मोसमात ही ताकद कोलकात्याची आतापर्यंतची कमजोरी ठरत आहे. आज कोलकातालाही सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही.
गत मोसमात गौतम गंभीर हा संघाचा मेंटॉर होता आणि त्याने नारायणकडे सलामीची जबाबदारी दिली होती. नारायणनेही दमदार खेळ दाखविला होता. नारायणने १५ सामन्यात १८०.७४ च्या स्ट्राइक रेटने एक शतक आणि तीन अर्धशतकां सह ४८८ धावा केल्या होत्या. नारायण या सत्रात संघात आहे पण फिल सॉल्ट नाही. आणि नकळत त्याचा परिणाम नारायणवरही होताना दिसतोय. आयपीएल मध्ये सहभागी दहाही संघांना प्रत्येकी १४ सामने खेळायचे असून आता कुठे चौथ्या फेरीचे सामने सुरू झाले आहे. या सामन्यापूर्वी केकेआर गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होता. मात्र या विजयाने ते पाचव्या क्रमांकावर पोहोचले. तर हैद्राबादच्या उगवत्या सुर्याला दहाव्या स्थानावर घसरावे लागले. हे सगळे सुरुवातीचे ठोकताळे आहेत. मोठं गणित तर सुरू व्हायला अजून मोठा कालावधी बाकी आहे. पण या विजयामुळे केकेआरला विजयाचा महामंत्र सापडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२