श्रीरामपूर / प्रतिनिधी:
वर्षभरापासून अनुदानासाठी आसुसलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थी लाखभर लेकरांची नवीन आर्थिक वर्षात अखेर प्रतीक्षा संपली आहे. या लेकरांसाठी महायुती सरकारने शंभर कोटी रूपये उपलब्ध करून दिल्याची माहिती मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व श्रीरामपूर भाजपचे उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी दिली.
सन २०२४-२५ या वर्षाखेरीस १०० कोटी ३३ हजार रू. मंत्रालयातून महिला व बालविकास आयुक्तालयात हस्तांतरित केले आहेत. यापूर्वी १०१ कोटी ४६ लाख रू. आयुक्तालयास वर्ग केले होते. त्यामुळे सन २०२४-२५ या आताच संपलेल्या आर्थिक वर्षात योजनेसाठी २०१ कोटी ४६ लाख ३३ हजार रू. प्राप्त झाले आहेत. या सर्व निधीतून सुमारे १ लाख १० हजार बालकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील थकीत लाभ मिळू शकणार आहे.
यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत १९७५ पासून राबविली जात आहे.
आजारपण व इतर विविध कारणांमुळे आई किंवा वडील गमावलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील पात्र मुला-मुलींसाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्थाबाहय व कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, या दृष्टीने या बालकांना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे.
२०१३ मध्ये १८ हजार बालकांना दरमहा ४२५ रूपये अनुदान मिळत होते. कोरोनाच्या महासंकटात मोठ्या प्रमाणात बालकांना आई, वडील अथवा दोघांचेही छत्र गमवावे लागले. त्यामुळे अनाथ अथवा एकल बालकांची संख्याही वाढली. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समन्वयक व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे व इतरांनी विविध पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता. समितीच्या माध्यमातून योजनेचा प्रचार, प्रसार झाल्याने लाभार्थी संख्या एक लाखापार झाली आहे. यशोमती ठाकूर महिला व बालविकास मंत्री असताना योजनेचे अनुदान दरमहा अकराशे रू. करण्यात आले. यात आणखी वाढ करण्याबाबत साळवे यांची तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या समवेत बैठक देखील झाली. तसेच विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाली. त्यानंतर २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालसंगोपन योजनेचे "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना" नामकरण करून दरमहा अनुदान अकराशे रूपयांवरून २ हजार २५० रू. करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची दोन वर्षांपासून १ एप्रिल २०२३ पासून अंमलबजावणी सुरू आहे.
मात्र हा निधी आयुक्तालयातील गोंधळामुळे सहा महिने ते दीड, दोन वर्षापर्यंत लाभार्थ्यांना मिळत नाही, याकडे साळवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे वेळोवेळी लक्ष वेधत अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
डी.बी.टी. च्या प्रायोगिक चाचणीसाठी एप्रिल २०२३ या एका महिन्याचे २२५० रूपयांप्रमाणे लाभ राज्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. एप्रिल २०२३ या एकाच महिन्याचे २२५० रुपयांप्रमाणे अनुदान राज्यातील ७२ हजार २११ बालकांच्या खात्यात जमा केल्याचा दावा महिला व बाल विकास आयुक्तालयाकडून केला होता. दुसरीकडे या सन २०२३-२४ पासून देखील राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचे बाल संगोपन योजनेच्या डी.बी.टी. अंमलबजावणीसाठी आग्रही असणारे महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक व कोरोना एकल महिला पुनर्वसनासाठी शासनाने गठीत केलेल्या मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांमध्ये एक, दोन वर्षांपासून योजनेचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात धूळ खात पडून आहेत, असेही साळवे यांनी निदर्शनास आणून दिले.
*लाडकी बहीण योजनेची गतीमान अंमलबजावणी करणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालया मार्फतच बालसंगोपन योजनेची अंमलबजावणी होते. मात्र दोन ते अडीच वर्षांपासून थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) प्रक्रियेद्वारे योजनेचे अनुदान राज्यातील थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची नवी कार्यपद्धती पूर्णपणे स्थिरस्थावर करण्यात आयुक्तालयास यश आलेले नाही. डी.बी.टी.द्वारे दरमहा योजनेच्या लाभार्थी लेकरांना लाभ मिळाला पाहिजे.- मिलिंदकुमार साळवे, सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.*
----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111