shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय संविधान काव्यजागर संमेलन उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी:-
कवी विजय बडबेराव आयोजित 
देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत  राज्यस्तरीय संविधान काव्य जागर काव्यसंमेलन एस एम जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे २४ मे रोजी प्रचंड उत्साहात संपन्न झाले.
     भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधानाला वंदन करून संमेलनाची सुरुवात झाली.
   पहलगाम येथील दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या  भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाकिस्तान सोबतच्या युद्धजन्य परिस्थितीतील ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्या शौर्याला टाळ्या वाजवून मानवंदना देण्यात आली.
सभागृहात  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

संविधान जागर अभियानांतर्गत माझे संविधान माझी जबाबदारी या उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल   नंदा मघाडे ( जामनेर जळगाव)  दुर्गा राऊत ( माजलगाव, बीड)  पूनम पाटील ( जळगाव)  विद्या मलवडकर ( सातारा)
प्रतिभा किर्तीकर्वे ( पुणे ) या फुलेप्रेमी संविधान दुतांना  " संविधान दूत " या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले.

      सर्व सामान्य नागरिकांच्या मनात भारतीय संविधानाविषयी आदरभाव, आपुलकी निर्माण व्हावी,  जनजागृती व्हावी, भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्क कर्तव्य आणि संविधानिक मूल्यांचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योग्य पद्धतीने प्रचार प्रसार व्हावा यासाठी संविधान काव्य जागर या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केले असल्याचे संमेलनाचे मुख्य आयोजक फुलेप्रेमी संविधान दूत भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी सांगितले.
 महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच कर्नाटक व गोवा इथूनही या कवी संमेलनासाठी कवींनी हजेरी लावून संविधान या विषयावरच्या आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या 

 माजलगाव बीड येथील डॉक्टर प्रवीण काळे यांनी बा भीमा दिलंस संविधान नावाचं हृदय तू या देशाला ही रचना प्रभावीपणे सादर केली.
 मडगाव गोवा येथून आलेल्या कवयित्री शोभा धामस्कर यांनी उभ्या जीवनी संविधानाने आम्ही मानव घडलो ही रचना उत्कृष्टपणे सादर केली.
 बेळगाव कर्नाटक येथील प्राध्यापक संजय बंड यांनी स्वातंत्र्य समता बंधुता हीच खरी मानवता ही रचना सादर केली 
 विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यातून आलेल्या कवयित्री कांताबाई सोनवणे यांनी देशाचा कर्णधार घटनेचा शिल्पकार ही रचना अतिशय सुंदर पद्धतीने गायन करून सभागृहाचे मन जिंकले.

 बाहेर दिवसभर पाऊस कोसळत होता आणि सभागृहात दिवसभर संविधानावर कविता बरसत होत्या. भर पावसातही राज्यातील अनेक जिल्ह्यातून आणि गोवा कर्नाटक या राज्यातूनही कवींनी उपस्थित राहून सभागृह पूर्ण भरून गेले होते.

 देशातील  सर्व सामान्य नागरिकांना, शेतकरी, कष्टकरी मजूर वंचित, दुर्बल घटकांपर्यंत त्यांना  संविधानाने दिलेले मूलभूत हक्क पोहोचावेत त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी संविधान जागर होणे गरजेचे आहे अशी भावना कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केली.

संविधान काव्य जागर संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्वच फुलेप्रेमी कवी कवयित्री या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे अध्यक्ष होते.
     संमेलनासाठी कवींना विनामूल्य प्रवेश होता. चहा, नाष्टा, जेवण, सहभाग प्रमाणपत्र इत्यादी सुविधा मोफत पुरवण्यात आल्या होत्या.
 
     सरिता कलढोणे, दुर्गा राऊत व नंदा मघाडे यांनी सूत्र संचालन केले. प्रतिभा किर्तीकर्वे, अरविंद बनसोडे, दत्तात्रय भोसले यांनी सर्व व्यवस्था पाहिली.
close