अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मानव विकास परिषदेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या बांधकाम विभागात गंभीर प्रकार समोर आला आहे. विभागाच्या दक्षिण शाखेत काही अपूर्ण व न केलेल्या कामांची बिले उचलून शासकीय निधीचा गैरवापर झाल्याची माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कामे न करता बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे बिले मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे शासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख
यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून निलंबित करावे, अशी उपोषण सुरू करून जोरदार मागणी केली आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.
शासनाच्या निधीचा असा अपव्यय रोखण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी व नियंत्रणाची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता याप्रकरणी प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.