अमळनेर (प्रतिनिधी) :तालुक्यातील मंगरूळ ते पिंपळे रस्त्याचे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे काम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अवघे दीड-दोन महिने होत नाहीत तोच नवीन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे.
रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसताना, जेवढे काम झाले आहे त्यावरही खड्डे पडलेले दिसत आहेत. साइड पट्ट्यांचे काम न झाल्याने आणि रस्त्याच्या बाजू भरल्या न गेल्याने, रस्त्याच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिल्लक असलेल्या सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी व मोठ्या वाहनांना खड्डे चुकवत प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघातही घडले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
📢 सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त आवाज:
"रस्ता बनवायला दीड महिना ते दोन महिने होत नाही तेवढ्यातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे."
— युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे