सामाजिक कार्य व पत्रकारितेतील योगदानाची दखल
शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन
कळस (ता. राहाता) येथील माजी सरपंच आणि पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे यांना सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘ध्येयरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ध्येय उद्योग समूह तर्फे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. माणिकराव शेवाळे होते.
यावेळी बेणके गुरुजी प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष सुनील बेणके, कळस ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र गवांदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश शिरकांडे, सुभेदार मेजर जालिंदर जगताप, अगस्ती साखर कामगार पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सहाणे, देवठाण सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व संपादक लहानु सदगीर यांनी केले.
भाऊसाहेब वाकचौरे यांनी संजय गांधी निराधार शासकीय योजना समितीचे अध्यक्ष म्हणून गोर-गरीब, निराधार, दिव्यांग, महिला, आदिवासी, दलित अशा वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कार्य केले आहे. ते कळस गावचे युवा सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, तसेच जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
भाजपाचे सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळे, शालेय साहित्य वितरण यांसारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.
भाऊसाहेब वाकचौरे यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाचा सोशल मीडिया महामित्र पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि जनसेवेच्या त्यांच्या वाटचालीला ‘ध्येयरत्न’ पुरस्कारामुळे आणखी बळ मिळाले आहे.
००००