शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
चंद्रपूर – महाराष्ट्रात प्रशासकीय सोय वाढवण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडे २० नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
सध्या राज्यात ३६ जिल्हे आणि ३८५ तालुके आहेत. त्यामध्ये मुंबई शहर हा एकमेव जिल्हा आहे ज्यात तालुका नाही. वाढती लोकसंख्या, प्रशासकीय अडचणी आणि जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, "८१ तालुके आणि सुमारे २० जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय जनगणना पूर्ण झाल्यावर आणि भौगोलिक स्थितीचा सखोल अभ्यास करून घेतला जाईल."
नव्या जिल्हे-तालुक्यांच्या निर्मितीमुळे
- नागरिकांना शासनाची सेवा अधिक जवळून मिळेल,
- स्थानिक विकास योजनांना गती मिळेल,
- शैक्षणिक, आरोग्य आणि पायाभूत सुविधा पुरवणे सोपे होईल,
असा सरकारचा हेतू आहे.
मात्र या प्रक्रियेसाठी मोठा खर्च, प्रशासकीय नियोजन, नवीन इमारती, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रस्तावावर चर्चा सुरू असून, जनगणनेनंतरच ठोस निर्णय घेतला जाईल.
००००

