इंदापूर : प्रतिनिधी दि.4/12/25
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि. 5) जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी गुरुवारी (दि.4) दिली.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. चालु 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये सुमारे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरु आहे, अशी माहिती अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली.
सद्य:स्थितीत कारखान्याला आर्थिक अडचण असतानाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टरित्या चालू असून, बुधवार (दि. 3) अखेर कारखान्याने 2 लाख मे. टन ऊसाचे गाळप करीत 145300 क्विं. साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा 10.70 टक्के असून, सरासरी साखर उतारा 10.00 टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 3500 मे. टन असून सध्या सरासरी 5700 ते 5900 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर 7230041 युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे. तर इथेनॉलचे आजअखेर 1690100 लि. उत्पादन निघाले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत. त्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे सौ.भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
शेतकी विभागाच्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार गळीत हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
•चौकट:-
विना कपात रु. 3101 प्रमाणे रक्कम शुक्रवारी जमा होणार-सौ.भाग्यश्री पाटील
-----------------------------------
नीरा भीमा कारखान्यास चालू ऊस हंगामामध्ये दि. 15 नोव्हेंबर पर्यंत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची कोणतीही कपात न करता रु. 3101 प्रमाणे होणारी ऊस बिलाची सर्व रक्कम शुक्रवार (दि. 5) रोजी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असे सौ.भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.
__________________________
फोटो

