आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अधिकाधिक कठीण बनला आहे. संघ आधीच गुणतालिकेत तळाशी अडकलेला आहे आणि आता कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जेव्हा संघ त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी रायपूरला रवाना झाला, तेव्हा हार्दिक पांड्या संघासोबत दिसला नाही. ही बातमी समोर येताच, हार्दिक अजूनही जखमी आहे की ही केवळ तंदुरुस्तीची समस्या आहे, या प्रश्नांनी सोशल मीडिया भरून गेले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी त्याची प्रेयसी महिकाही मैदानावर उपस्थित नव्हती, तसेच हार्दिकही संघासोबत नव्हता.
संघ विमानतळावर दिसला, हार्दिक अनुपस्थित
क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचे खेळाडू बुधवारी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर दिसले, परंतु कर्णधार हार्दिक उपस्थित नव्हता. तो नंतर संघात सामील होईल की नाही हे सध्या अस्पष्ट आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यातील हार्दिकच्या अनुपस्थितीबद्दल, फ्रँचायझीने सांगितले होते की त्याला पाठीचा त्रास (बॅक स्पाझम) झाला होता. मुंबई इंडियन्सने एक निवेदन जारी करून म्हटले, "हार्दिकची प्रकृती पाठीच्या त्रासामुळे ठीक नाही, त्यामुळे सूर्यकुमार यादव सामन्याचे कर्णधारपद भूषवेल."
दुखापत की आणखी काही ? चर्चांना उधाण
हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे, कारण पूर्वी असे मानले जात होते की त्याची पाठीची समस्या गंभीर नाही आणि तो लवकरच परत येईल. तथापि, आता त्याच्या संघातून अनुपस्थितीमुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. काही चाहते प्रश्न विचारत आहेत की कर्णधारावर खूप जास्त दबाव आहे का. खराब फॉर्म आणि संघाच्या परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम झाला आहे का? काहींनी मुंबई -चेन्नई सामन्यानंतर हार्दिक आणि सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांच्यात झालेल्या संभाषणाचा संबंधही या प्रकरणाशी जोडला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे की, कासी यांचे २०२५ मध्ये संजू सॅमसनसोबत असेच संभाषण झाले होते आणि तो यावर्षी सीएसकेमध्ये आहे. हार्दिक चेन्नई संघात सामील होऊ शकतो, अशी बातमीदेखील सोशल मीडिया वापरकर्ते पसरवत आहेत. तथापि, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या मोसमात हार्दिकची कामगिरी निराशाजनक
या मोसमात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये केवळ १४६ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेटही सामान्य आहे. तो आपल्या गोलंदाजीनेही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याच्या निर्णयांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. संघाने अटीतटीचे सामने गमावले आहेत आणि हार्दिक महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. लखनौविरुद्ध मुंबईच्या विजयानंतर, दीपक चहरची बहीण, मालती चहरने सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाचे कौतुक करणारी पोस्ट टाकली आणि म्हटले की, या सामन्यात मुंबई इंडियन्स जुन्या मुंबई इंडियन्ससारखी दिसत होती. याला हार्दिकवर केलेला टोमणा मानले गेले. परिणामी, मुंबई संघात सर्व काही आलबेल नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई गुणतालिकेत शेवटून दुसरे
पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. १० सामन्यांमध्ये केवळ तीन विजय मिळवल्यामुळे संघाची ही मोहीम निराशाजनक ठरली आहे. या घसरणीचे कारण कर्णधारपदातील बदल असल्याचे म्हटले जात आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद घेऊन ते हार्दिककडे सोपवणे हा संघ व्यवस्थापनाचा एक मोठा निर्णय होता. हार्दिक संघात नवी ऊर्जा आणेल अशी आशा होती, पण निकाल मात्र उलट लागले. रोहितच्या कार्यकाळात, मुंबई इंडियन्स आपल्या शांत रणनीती, स्पष्ट नेतृत्व आणि मोठ्या सामन्यांतील वर्चस्वासाठी ओळखले जात होते. या हंगामात संघात त्या स्थिरतेचा अभाव होता.
रायपूर सामन्यावर सर्वांच्या नजरा
आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १० मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हार्दिक त्या सामन्यासाठी संघात सामील होईल की नाही. जर तो संघाबाहेर राहिला, तर ही केवळ एका खेळाडूची अनुपस्थिती नसेल, तर संघर्ष करणाऱ्या संघासाठी हा एक मोठा धक्का असेल. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी, सध्या एकच प्रश्न आहे की कर्णधार परत येईल का आणि संघ पुनरागमन करू शकेल का.
वास्तविक हार्दिक पांड्या २०२२ ला नव्याने आलेल्या गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला व पदार्पणातच संघाला विजेते बनवले, २०२३ ला गुजरात उपविजेते राहिले. एवढ्या चांगल्या कामगिरीनंतर पांड्या आपल्या पूर्वाश्रमीच्या मुंबई संघात २०२४ ला कर्णधार करण्याच्या बोलीवर आला आणि मुंबई मॅनेजमेंटने त्याला त्या वर्षीच्या आयसीसी टी२० विश्वविजयी भारतीय कर्णधार व मुंबईच्या पाचही विजेतेपदांच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्माच्या जागेवर कप्तान केले व त्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी जी रूळावरून घसरली ती अजून पटरीवर आलीच नाही व आता हार्दिकही कर्णधारपदावरील दावा गमावून बसला.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. ९०९६३७२०८२

