इंदापूर : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण काळेवाडी नं. १ शाळेत आगळ्यावेगळ्या व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राख्या बांधून ‘वृक्ष हेच आपले खरे रक्षक’ असा सामाजिक संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांना राख्या बांधून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संकल्प केला. वाढते प्रदूषण, कमी होत जाणारे वृक्षक्षेत्र आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल याबाबत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ तसेच ‘वृक्ष हेच आपले जीवनदाते आहेत’ अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याची जपणूक न करता वृक्षांशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जिव्हाळा, जबाबदारी आणि संवर्धनाची भावना निर्माण झाली.
यावेळी सर्व मुलांनी मुलींना पेन व पेन्सिल भेट देऊन रक्षाबंधनाच्या नात्यातील प्रेम व आपुलकी जपली. विद्यार्थ्यांनी एकमेकांप्रती स्नेह, आदर आणि बंधुभाव जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे, अंगणवाडी सेविका संगीता चव्हाण मॅडम व अंगणवाडी मदतनीस मीरा नाईकवाडी मॅडम यांनी केले.
पालक व ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा दिलेला संदेश आणि विद्यार्थ्यांनी जपलेला स्नेहबंध हा समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

