गडचिरोली ता.३०:- भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल २७ हजार ९८८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नदी , नाले फुगत असून जिल्ह्यात पुराची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदी, नाल्यांच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काल देसाईगंज तालुक्यातील सावंगी, धरमपुरी येथील असे ५२ कुटुंबाना तात्काळ स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले.गडचिरोली जिल्हयात वैनगंगा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने वडसा, आरमोरी, मार्कंडा,अहेरीसह सिरोंचा भागात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या अधिक विसर्गामूळे जिल्हयातील पाच प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहे.
गडचिरोलीहून नागपूरकडे जाणारा मार्ग, आरमोरी जवळील पाल व गाढवी नदीच्या पुलावर पाणी मार्ग , गडचिरोली ते चामोर्शी यात शिवणी व गोविंदपूर नाला , आरमोरी ते रामदा रस्ता- गाढवी नदीवरील पूल , आष्टी गोंडपिंपरी रस्ता , आरमोरी ते ब्रह्मपुरी रस्ता , अहेरी - व्यंकटापूर (गडअहेरी नाला).
आज सकाळी ८ वा. गोसेखुर्द धरणाच्या २३ गेटमधून २७९८८ क्यूमेक्स एवढा विसर्ग सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा , प्राणहिता ,गोदावरी पात्रात अनुक्रमे पाणी पातळीत वाढ होत राहणार आहे.भविष्यात गोसेखुर्द मधून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, सबब सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणेने तत्पर रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनीं दिले आहे.
नदी किनारी सर्व गावांनी,नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी उचित काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

