संघर्षनायक ॲड. राहुल मखरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.- नानासाहेब सानप
(५० व्या वाढदिवसानानिमित्त विशेष लेख)
इंदापूर: (दि.२९ मे २०२५)हजरजबाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण ॲड. राहुल मखरेंकडे असल्यामुळे तल्लख विलक्षण बुद्धीमत्तेने समोरच्या व्यक्तींच्या मनात अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नेतृत्व,वक्तृत्व, आणि कर्तृत्व या त्रिवेणी संगमाचा मिलाप म्हणजे वकीलसाहेब. कोणत्याही प्रसंगात मिश्किल, विनोदी शैली त्यांच्या वाणीत पहावयास मिळते. नेतृत्व करायला वय लागत नाही, लागत ते साहस, बुद्धी, चातुर्य आणि निर्णय क्षमता..! हे त्यांच्या बुद्धीचातुर्यातून सहज दिसून येते.
कॉलेज जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त उदंड दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!
महाविद्यालयीन जीवनातच वकील साहेबांना सामाजिक कार्याची गोडी लागली.
प्रेमाने संवाद साधणारे मखरे कित्येकदा सामाजिक कार्य करताना सर्वांना आनंद देणारे युवा नेतृत्व भावतात. प्रभावीत करण्याची कला व क्षमता यांचा अनोखा संगम म्हणजे ॲड. राहुल मखरे !
सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सर्वांना मदतीचा हात देणारे . अहोरात्र कष्ट करताना, जनहित डोळ्यासमोर ठेवून कल्पकतेने आपल्या उच्च शिक्षणाचा ठसा सामाजिक कार्यात उमटवताना ते आपणास दिसून येतात. एका निष्णात विधीज्ञाच दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वातून पहावयास मिळते.
कोणतेही काम हातात घेतले की, त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण होईपर्यंत न थांबणारे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल मखरे होय. त्यांच्या कामातलं सातत्य नेहमीच लोकांना प्रभावित करते. त्यामुळे त्यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला आपलं काम खात्रीने होणार असा विश्वास वाटतो.
सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा वडील रत्नाकर मखरे (तात्या) यांच्याकडून त्यांना लाभलेला आहे. समाजातील लोकांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन सोडवणुकीसाठी शाश्वत उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल असतो. तात्पुरती मदत ही ठराविक काळासाठी असते आणि शाश्वत उपाय योजना ही एखाद्या अडीअडचणीचे समाधान असते. हा विचार त्यांचा आहे.यामुळेच समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातील लोकांसह मित्र परिवाराला झाल्याशिवाय राहत नाही.
विचारांची उंची ही सुसंस्कृतपणावरच अवलंबून असते, हा गुण संस्कारांनी निर्माण होतो. संस्काराचे दर्शन वकीलसाहेबांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच जाणवते. संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची गरज समाजाला असते. ती गरज वकीलसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वामुळे पूर्ण होते.सामाजिक जीवनात काम करत असताना विवेकशीलतेला खूप महत्त्व आहे. कोणताही सामाजिक निर्णय घेत असताना निरपेक्ष, विवेकी निर्णय घ्यावा लागतो. ज्यामुळे कोणावरही अन्याय होत नसतो. ते कोणताही निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक विचार करून घेतात. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा विवेकशीलतेचे दर्शन घडवतो.
विचारांचं बाळकडू हे वडील रत्नाकर मखरे (तात्या) यांच्याकडून मिळाल्यामुळे अगदी कोणत्याही विषयावरती त्यांचे विचार हे अभ्यासपूर्ण, परिपक्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारे असतात.
गोरगरिबांच्या,कष्टकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न दिसतो,अविरत कष्ट करण्याची तयारी उपजतच त्यांना लाभली आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम घेण्यात मार्गदर्शक म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पद असो वा नसो विधायक कामं करून नावलौकिक वाढवता येतो, याचे उत्तम उदाहरण ॲड.राहुल मखरे (वकील साहेब) हे आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय जीवनात बामसेफ संघटना, भारत मुक्ती मोर्चा,बहुजन मुक्तीपार्टीत मिळालेल्या जबाबदाऱ्या निर्भीडपणे पार पाडल्या. *राजकीय घडामोडीनंतर वकील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केला. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्ष श्रेष्ठींनी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीसपदासंह प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली. पक्षप्रमुख राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनात पक्षाची प्रतिष्ठा,निष्ठा राखत स्वतःला झोकून देऊन पक्ष वाढीसाठी आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी करीत काम आहेत.*
लोकांना न्याय मिळावा यासाठी वेळप्रसंगी संघर्ष, आंदोलनं, रास्तारोखो, उपोषणं केली. प्रसंगी तुरुंगवास देखील वकील साहेबांना भोगावा लागला. यामुळे लोकांची जोडली गेलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे.तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या नामांकित शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. युवकांमध्ये वकील साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा पाहावयास मिळतो.
*एप्रिल २०२० च्या अखेरीस कोरोना काळात ज्यांच्या हाताला काम नव्हते, ज्यांची हातावरची पोटं होती.ज्यांची रोज कामधंदा केल्याशिवाय घरची चूल पेटत नव्हती अशा लोकांना माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) व ॲड.राहुल मखरेंनी इंदापूर शहरातील आंबेडकरनगर,साठेनगर, होलारवाडा, व्यंकटेशनगर आदी भागातील गोरगरीब, गरजूंना गहू,तांदूळ आदी धान्याचे ४० ते ४५ पोते वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप केले. त्यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत केली.यातून आपल्याला त्यांची जनसेवेची तळमळ दिसून येते.*
समाजकार्यातून राजकारण करणारी ही व्यक्ती असल्यामुळे समाज मनावर त्यांच्याबद्दल आदर आणि मैत्रीच्या भावना सबंध राज्यभर पाहावयास मिळतात.
*कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रकरणी वकीलसाहेब कायदेशीर लढाई लढत आहे. त्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांची क्रॉस एक्झामिनेशन घेतली. ॲड . राहुल मखरे यांचे आपल्या वकीलीचे कसब या आयोग प्रकरणी दिसून येत आहे.*
*पुण्य परोपकार पाप ते परपीडा!*
*या भूमिकेतून पक्षीय भेदाभेद न बाळगता लोकांची, कार्यकर्त्यांची कामे त्यांनी अपेक्षेविना करत असतात.*
*व्यावसायिक वकिली ॲड.* *राहुल मखरेंनी कधी केली नाही.*
*गोरगरीबांसाठी ते अत्यल्प फी मध्ये वकिली करतात. आणि कार्यकर्त्यांसाठी विनाशुल्क वकिली करतात. म्हणून ॲड.राहुल मखरे हे खऱ्या अर्थाने जनतेचे वकीलसाहेब झाले.*
केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी यासाठी त्यांनी आंदोलनं केली. त्यांचं नेतृत्व अधिक उमेदीने पुढं येऊ लागलं.
त्यांचा मित्रपरिवार हा इंदापूर तालुक्याच्या सीमा पार करून जिल्ह्यातील अनेक तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम वकील साहेबांच्या हातून होत आहे. असा विश्वास राज्यातील तरुणांना आहे.
शिव, फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेने प्रेरित होऊन सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने अविरत काम सुरु आहे. बहुजन महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. बहुजन महापुरुषांच्या कार्याचा वसा आणि वारसा तरुणांनी कसा घ्यावा, या संदर्भात मार्गदर्शन करतात, राष्ट्रीय सण, उत्सवाच्या वेळी समाजात देशभक्ती वाढावी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आवर्जून आपली उपस्थिती दर्शवितात.
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या, कृतिशील,आक्रमक,संघर्षशील व्यक्तिमत्व असलेल्या त्यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यांनी सामाजिक बांधकी जपत उद्याच्या नेतृत्वाची चुणूक आपल्या कामातून दाखविली आहे. वडील रत्नाकर (तात्या) मखरेंच्या समृद्ध राजकारणाचा वारसा त्यांना मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत समाजहितासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवयाचे कसे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे वकीलसाहेब.
आमचे बंधुतुल्य, मार्गदर्शक त्यांची संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता कामातून दिसून येते. जनतेच्या समस्यांचे निराकरण करताना केला जाणारा पाठपुरावा.त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ॲड. राहुल मखरेंनी तमाम युवा वर्गात नावलौकिक मिळवला आहे.
*संघर्षनायक ॲड.राहुल मखरे यांना ५० व्या वाढदिवसानानिमित्त मनपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!!*
*शब्दांकन* :
*नानासाहेब सानप*
*(सर)*
*भिमाई आश्रमशाळा, इंदापूर*