लातूर, प्रतिनिधी :-
विमुक्त भटक्या समूहातील वडार ही एक जमात. या जमातीतील तरुणांना उद्योग- व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळावे, यातून तरुणांना उद्योग व्यवसायकडे वळवता यावे तसेच अनेक उद्योजक तयार व्हावेत यासाठी वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊनही या समूहातील घटकांना अद्यापही कसलाच लाभ झाला नाही, तर हे महामंडळ केवळ आणि केवळ अद्यापही कागदावरच राहिलेले आहे असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
श्रीकांत मुद्दे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 री उलटली तरी अजूनही आमची भटकंती संपली नाही. या देशात पाषाण संस्कृती घडवण्यात वडार जमातीचा फार मोठा वाटा आहे, असे असतानाही शासन स्तरावर या जमातीकडे सातत्याने राजकीय नेत्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले ही पुरोगामी महाराष्ट्रातील वडार जमातीची शोकांतिका म्हणावी लागेल. असे असताना २०१४ साली याच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर एक आशादायक चित्र निर्माण झाले.
मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत २०१८ साली याच महाराष्ट्रात दोन महामेळावे झाले. या महामेळाव्यांमध्ये घोषणांचा पाऊस पाडण्यात आला, मात्र मागील सात वर्षात एकही मागणी पूर्ण झाली नाही. त्यातील एक घोषणा म्हणजे पै.कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या महामंडळ अंतर्गत 50 कोटी वर्ग करण्यात आले होते. त्या अंतर्गत वडार समूहातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांना कर्जपुरवठा करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचे हात देण्याची घोषणा या महामंडळाच्या अंतर्गत देण्यात आले, मात्र महामंडळ अस्तित्वात येऊनही या महामंडळाला ना खुर्ची,ना टेबल, ना कार्यालय निधीचा तर पत्ताच नाही अशीच दुरावस्था या वडार महामंडळाची झाली आहे. या महामंडळ अंतर्गत एकाही लाभार्थ्याला अद्यापपर्यंत कर्जपुरवठा करण्यात आला नाही की, कसलाच लाभ या महामंडळाचा वडार जमातीला झाला नाही,
हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. याच फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात वडार जमातीची सातत्याने या राजकारण्यांकडून परवडच होत राहिली आहे, याला काय म्हणावे? चोर चोर मावस भाऊ आणि वडार बांधवांच्या टाळू वरील काबाडकष्टाचे लोणी आपण सगळे वाटून खाऊ अशीच अवस्था या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी या वडार जमातीची केली आहे, हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले खरे परंतु या महामंडळाला निधीच दिला गेला नाही. अद्यापही कसले शिष्ट मंडळ नेमण्यात आले नाही. भटके-विमुक्त वसंतराव आर्थिक विकास महामंडळ अंतर्गतच हे महामंडळ गुंडाळण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
या महामंडळास ना निधी, ना कर्ज वाटप, ना कसलाच लाभ अद्याप वडार जमातीला झाला नाही, हे कशाचे द्योतक आहे सातत्याने शासन पातळीवरील अनास्थेचे दर्शवणारे हे चित्र आहे असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यास तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.