वडाळा महादेव(वार्ताहर)-
भूमी फौंडेशन,महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेचे पाचवे साहित्य व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.भूमी फौऊंडेशन ही सामाजिक सेवाभावी संस्था गेल्या पाच वर्षापासून ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेत असून यावर्षी दूरदर्शी पद्धतीने आयोजित केलेल्या या साहित्य व कविसंमेलनाचे उद्घाटन सा.आयुक्त महिला व बालकल्याण आयुक्तालय पुणे येथील अश्विनी कांबळे यांनी उद्घाटनपर भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कैलास पवार, व अध्यापिका सौ.अनिता पवार यांच्या अपूर्व योगदानाचे आणि शेतकरी मुलींच्या शिक्षणाची घेतलेली जबाबदारी,निवासी वसतिगृह, उपक्रम तसेच साहित्य संमेलनाचे आयोजन याबद्दल कौतुक केले. अध्यक्षस्थानी पुणे येथील भारतीय जैन संघटना वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गायकवाड होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये होते .संयोजक डॉ.कैलास पवार यांनी स्वागत,प्रास्ताविक करून मान्यवरांची ओळख करून दिली.वाघोली पुणे येथील सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृहातील मुलींनी स्वागतगीत सादर केले.कु.शीतल बाळासाहेब म्हस्के या विद्यार्थिनीने महाराष्ट्र गीत सुंदर आवाजात सादर केले.साहित्यिका सौ.मीना गागरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.त्यामध्ये राज्य,देश आणि परदेशातून अनेक कविंनी भाग घेतला.प्राचार्य शेळके यांनी भूमी फौऊंडेशनच्या प्रारंभापासूनच्या जलसंधारण, शेतशिवार उपक्रम, शैक्षणिक,सामाजिक कार्य सांगून साहित्य संमेलनाचे औचित्य याविषयी डॉ कैलास पवार यांचे कौतुक केले.
साहित्य माणसाला माणूसपणाची संस्कृती सांगते:- डॉ.बाबुराव उपाध्ये
मानवी संस्कृती विचार, आचारातून आकाराला आली आहे. साहित्य माणसाला माणुसपणाची संस्कृती देते, रानटीपणापासून त्याला दूर ठेवते. असे सांगून डॉ.बाबुराव उपाध्ये पुढे म्हणाले,साहित्य म्हणजे समाजहित साधते ते लेखन असून कविसंमेलन ही मुक्त संवादाची कार्यशाळा आहे.भूमी फौऊंडेशन ही माणुसकी घडविणारी कार्यशाळा आहे,माणसांच्या उद्धाराचा सेवारथ चालविणारे डॉ.कैलास पवार आणि अध्यापिका अनिता पवार यांच्या समर्पित जीवनाचा हा सेवारथ पुढे जाण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले पाहिजे अशी भावना व्यक्त करून महाराष्ट्र माझा ही कविता सादर केली.
साहित्यिका मीना गागरे यांनी मनोगत व्यक्त करून कविसंमेलनात ज्यांनी भाग घेतला त्यांचे क्रमांक घोषित केले.राज्यातून प्रथम क्रमांक नाशिक येथील डॉक्टर शिल्पा बोरकर व द्वितीय क्रमांक महांकाळ वाडगाव येथील चक्रनारायण किशोर आणि तृतीय क्रमांक हा वाघोली पुणे येथील किशोर पांचाळ यांनी पटकावला आहे.सर्व क्रमांक प्राप्त कवींचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. क्रमांक प्राप्त कवींचा यथोचित असा सन्मान संस्थेच्या येणाऱ्या आगामी कार्यक्रमात करण्यात येणार आहे आयोजकांनी सांगितले आहे.यावेळी विवेक शिवणकर,प्रा.डॉ. यादव,धनराज वाळके,भूमी फाउंडेशन समन्वयक भीमराज बागुल आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास असंख्य सहभागी कवी- कवयित्री मोठ्या संख्येने सहभागी झाले. आरोग्यमित्र भीमराज बागूल यांनी आभार मानले.