shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धरणगाव चौफुलीवरील उड्डाणपूल अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत नाराजी.

धरणगाव चौफुलीवरील उड्डाणपूल अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत नाराजी.

एरंडोल(प्रतिनिधी)
–एरंडोल-राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर धरणगाव चौफुली येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पुलाखाली व आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या अनधिकृत व्यवसायामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. या गंभीर समस्येकडे न्हाई, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुलाखाली आणि त्यालगत अन्नपदार्थ, थंडपेय, फळे व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हातगाड्यांचा सुळसुळाट झाला आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्यामुळे रस्ता अरुंद होत असून, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांची देखील या भागात पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतूक अधिकच विस्कळीत झाली आहे.

शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे नवीन वसाहतींमधील नागरिक, विद्यार्थी आणि कामावर जाणारे नागरिक उड्डाणपुलाखालून ये-जा करत असतात. परिणामी या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. धुळे, जळगाव, धरणगाव, म्हसावद या दिशांनी येणारी वाहने देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पुलाखालील अतिक्रमण कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात घडवू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

यापूर्वी किरकोळ स्वरूपाचे अपघात घडल्याचेही निदर्शनास आले असून, काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. मात्र तरीही संबंधित विभागांनी याची दखल घेतली नसल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले आहे, मात्र पुलावर लावण्यात आलेल्या जाहिरातींच्या फलकांमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.

धरणगाव रस्त्यावरील दहाखूटी ते म्हसावद नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणाने व्यापून टाकले असून, त्यामुळे अनेकदा ग्राहक, वाहनचालक आणि व्यावसायिक यांच्यात वादविवादही होत आहेत. पुलाखाली काही युवक गटागटाने थांबत असल्याने महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

close