प्रतिनिधी, एरंडोल – एरंडोल तालुक्यात मंगळवारी (11 जून) सायंकाळी साडेआठच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. रिंगणगाव आणि फरकांडे येथे भिंत कोसळून दोन वयोवृद्ध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या वादळामुळे तालुक्यातील अनेक भागांत घरांचे, झाडांचे आणि वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून, गेल्या 18 तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे.
वादळाच्या तडाख्याने रिंगणगाव येथील नारायण सीताराम पाटील (वय ६८) आणि फरकांडे येथील गोपाळ मोतीराम पाटील (वय ७५) या दोघांना घराची भिंत कोसळल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. याशिवाय, जवखेडा बुद्रुक येथे एक गाय व म्हैस तर उमरदे येथे चार म्हशी भिंतीखाली येऊन मृत्युमुखी पडल्या आहेत.
वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाली, शेकडो झाडे जमीनदोस्त झाली, विजेचे पोल आणि तारा तुटून जमिनीवर आल्या. काही भागांत सोलर प्लेटही उडून गेल्या. नॅशनल हायवेवरील दिशादर्शक फलक देखील उध्वस्त झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. धरणगाव रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक बंद होती.
महावितरणच्या शेकडो विजेच्या खांबांना आणि ताऱ्यांना नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी विजेचे पोल झाडाखाली दबले आहेत. परिणामी, तालुक्याचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. नायब तहसीलदार संजय घुले यांनी माहिती दिली की, महसूल विभागाकडून पंचनामे तातडीने सुरू आहेत.
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, अधिकारी जयदीप आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, लवकरच संपूर्ण तालुक्यात वीज सेवा पूर्ववत होईल.