shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.डॉ. सुभाष वाघमारेमराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा


काय ?  कशाला घेतलास आर्टसला प्रवेश ? काय त्याचा उपयोग आहे का? आर्ट्स म्हणजे आयुष्यभर बेकार राहण्याचा मार्ग ! झक मारली न आर्ट्स घेतला ! पोटासाठी कंपनीत नोकरी करून शिकायचे म्हटल्यावर कुठला तरी आर्ट्सचा विषय घेऊ.... आम्ही कुठे एवढे हुशार हाय ? म्हणूनच आर्ट्स घेतले---पोरीला लय शिकवून काय उपयोग आर्ट्सला घातली तिला ! ८० अन ९० टक्के मार्क्स मिळवली तर काय आर्टने नोकरी मिळती व्हय ? प्राध्यापक लय बोलतात ,पण स्वतःची मुले आर्टला घालतात का ? ..सर ..पोरगी आजारी हाय ---पोरगं पुण्याला हाय ..काय लिहून द्यायचे हाय का?  ....हे आणि असले अनेक  संवाद जीवनात नित्याचे झालेत. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विषमता असलेल्या भारतात ,शिक्षण व्यवस्थेचे नेमके चालले आहे काय ? याबद्दल ना व्यवस्था सांभाळणारे यांना कळत नाही,नां पालक आणि विद्यार्थ्याला ! ना माझ्यासारख्या लेख लिहून जागृती करणाऱ्याला ,काळजीने काळीज फाटलेले प्राध्यापक आणि प्रवेश घेऊन गायब होणारे  विद्यार्थी मित्र ---या सर्व वातावरणात सत्याचा शोध आपण घेणार आहोत का ? हा खरा प्रश्न आहे...


विज्ञान, वाणिज्य आणि इंजिनिअरिंगच्या गर्दीत प्रवेश नाही मिळाला तर कला शाखा आहेच.  काय तरी काम करत करत शिकायचे असेल तर घ्या आर्ट म्हणून अतिशय उदासीनतेने या शाखेकडे पहिले जाते. ‘सर तुमचा विषय कोणता ? ‘मराठी !”...मराठी  ..बर  बर म्हणून  आता ते घेऊन आम्ही काय करणार ? असे  म्हणून काढता पाय घेणारे  पालक विद्यार्थी अनेक आढळतात. खूप कमी वेळात नोकरी मिळेल असे काही नाही का ? असे सर्वांच्या मनात.  गृहपाठ  लिहिला कि झाले शिक्षण ,केला प्रोजेक्ट आणि दिली परीक्षा,की झाले शिक्षण... हा जो प्रकार  घडत आहे, त्यामुळे  शिक्षण  घेण्यासाठी क्षणभर तरी वेळ  द्यायची इच्छा याना आहे का ,हा प्रश्न आहे. आपली आवड काय ,निवड काय,मला काय जमेल , कसलाच विचार नाही.. वर्गात हजर नाही आणि शिक्षण मात्र सुरु आहे..   अशाने जीवन हिमतीने जगण्याची कौशल्ये कुठून येणार ? अगतिक – उदास  झालेल्या ..शक्तीची जाणीव नसलेल्या ,गैरसमज घेऊन पुढे जाणाऱ्या या  प्रगतीच्या गाड्या ,पुढे खोल दरीत का पडणार नाहीत ? म्हणूनच समजून घ्यायला हवे  की कला शाखा ही केवळ शिक्षणाची शाखा नाही, ती माणूस घडविण्याची कार्यशाळा आहे.

कला शाखेचा आयाम किती मोठा आहे.मानव्यविद्या असलेल्या या शाखेतील विषय समजून घेण्यासाठी जीवन कमी पडेल. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, चित्रकला, लोककला, माध्यमशास्त्र, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, स्त्रीअध्ययन – हे सारे विषय केवळ परीक्षेपुरते नसून,समाजाच्या हितासाठी काम करणारे विषय आहेत. या शाखेतले विद्यार्थी जर सावध राहिले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर बनू शकतील. पण नकारात्मक जगण्याने ,लक्ष न देण्याने आपण आपले वाटोळे करून घेत आहोत. कोणत्याही शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शक यांना शिकविण्याची अभ्यास करण्याची इच्छाच नसेल, जीवन घडविण्यासाठी मी काय करायला पाहिजे याची जाणीवच नसेल तर जगातला कोणताही विषय घेतला तर आपण त्याचा कचरा करून टाकतो. आणि स्वतः देखील निरूपयोगी होतो. म्हणूनच रसरशीतपणे ,ध्यास घेऊन एकेक शिखर वर चढत जाण्याची भावना ही विद्यार्थ्यात असायला पाहिजे. कला शाखा म्हणजे सर्जनाचा खजिना आहे, कल्पकता वापरून तुम्ही परिस्थिती बदलू शकता पण तुमी विचार करणार आहात का ? हाच खरा प्रश्न आहे. विचार पेरा ,आचरणात आणा ,अभ्यास करा ,स्वप्न पहा ,आणि पर्वतावर जा ...हताश झालेले ,थकलेले जीव ,म्लान झालेले कुणीही कधीच प्रगती करत नाही.. झुज देण्याची हिम्मत मनात निर्माण करून अथक परिश्रम करून ध्येय सध्या करायचे असते. दुबळे जीव मागे पडणार ,उत्साही जीव ,स्टेशनला पोचणार ,पण मनाची शक्ती गेली कुठे ? हा प्रश्न मला सतत पडतो.मी १० वीला  ५ विषयात नापास होतो. पण आमच्या शिक्षकाच्या प्रेरणा मार्गदर्शन आणि स्वतःला घडविण्यासाठी केलेले वाचन लेखन  ,यामुळे आज माणूसपण मिळविले आहे. यात आपल्यातल्या साऱ्या कला मी आजही वापरत असतो.आणि नव्या युगाचे तंत्रज्ञान सुद्धा सोबतीला घेत असतो. या शाखेतून विद्यार्थी विचारशक्ती, अभिव्यक्ती, आकलन, भाषाशैली, संवाद, लेखनकौशल्य, समाजभान व मूल्यज्ञान यांमध्ये पारंगत होतो. कला शाखेची हीच खरी ताकद आहे – ती माणूस घडवते, विचार देते, दिशा देते. कला शाखा ही ‘व्यवसायविरोधी’ नसून उलटपक्षी ती संघटक, प्रशासक, शिक्षक, लेखक, पत्रकार, समाजसेवक, कायदेतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी अशा अनेक क्षेत्रांतील पाया आहे. आज IAS, UPSC, MPSC, NET/SET, पोलिस सेवा, पत्रकारिता, NGOs, कॉर्पोरेट रिसर्च, डेटा अ‍ॅनालिटिक्स, भाषांतर, पर्यटन मार्गदर्शन, सोशल मिडिया व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत कला शाखेच्या विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे.

अर्थात हे घडवण्यासाठी फक्त पदवी मिळवणं पुरेसं नाही; त्यासाठी विद्यार्थ्यांनीही स्वतःला योग्य रीतीने घडवावं लागतं. विद्यार्थ्यांनी प्रथम ‘कला शाखा’ला कमी लेखणं थांबवावं. ही शाखा म्हणजे ‘साधी गोष्ट’ नसून, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अर्थ देणारी शिस्त आहे. वर्गात नियमित उपस्थित राहून, विषय समजून घेऊन, चर्चेत सहभागी होत, प्रकल्प करत, वाचन-विचार वाढवून विद्यार्थ्यांनी स्वतःहून शिकायला शिकलं पाहिजे. कोणत्याही शाखेची खरी ताकद विद्यार्थी स्वतःच ठरवतो.

कला शाखेत अनेक विद्यार्थी हे काम करत शिकतात. त्यांच्यासाठी महाविद्यालयांनी लवचिक वेळापत्रक, पूरक वर्ग, मार्गदर्शन तास, आर्थिक सहाय्य योजना राबवाव्यात. शिक्षकांनी त्यांच्याशी सहानुभूतीने वागून, शिकण्याची प्रेरणा दिली पाहिजे. समाजाचे खरे कर्तृत्व हे अशा कष्टकरी विद्यार्थ्यांमध्ये दडलेले असते.
महाविद्यालयांनी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, व्यावसायिक, भाषिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोन देणारे उपक्रम हाती घ्यावेत. नाट्यप्रयोग, साहित्य कट्टे, क्षेत्रभेटी, लोकसंवाद, मुलाखती, सर्जनशील लेखन, डिजिटल सादरीकरण यांमुळे वर्गात रेंगाळणारा विद्यार्थी ‘मंचावरचा नेता’ होऊ शकतो.तसेच, नियमित उपस्थितीची प्रोत्साहन योजना, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तास, करिअर संवाद सत्रे, आणि ‘मेंटॉर प्रणाली’ यांमुळे विद्यार्थी वर्गात खेचले जातील, आत्मविश्वासाने पुढे जातील.

 कला शाखा ही आयुष्याची तयारी आहे . कला शाखा ही केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याची नव्हे, तर जीवन समजून घेण्याची शाखा आहे. जिथे विचार असतो, तिथे परिवर्तन घडतं आणि कला शाखा म्हणजे विचारांचा धबधबा आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी जर प्रामाणिकपणे शिकायला सुरुवात केली, तर त्यांचं भवितव्य केवळ पदवीधर होण्यात नाही, तर IPS, कवी, समाजसुधारक, संसदपटू, भाषांतरकार, संशोधक, शिक्षक, उद्योजक इ. रूपांमध्ये घडू शकतं. विद्यार्थ्यांनो, कला शाखा निवडताना लाजू नका; ती तुमचं भविष्य उजळवण्याची पहिली पायरी आहे. तुमचं व्यक्तिमत्त्वच तुमची मोठी ताकद आहे – आणि ही ताकद घडवण्यासाठी कला शाखा हेच योग्य विचारपीठ आहे. माझ्यातील कलेचा विकास हा मी छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी असताना झाला ,त्यामुळे ,लेखन ,वाचन ,गायन ,भाषण ,संपादन, अशा कितीतरी गोष्टी आज मी करतो.. मी कलेच्या बाबतीत कधीच निवृत्त होणार नाही. कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे हे विचार मला माझ्या चिंतनातून कल्पकतेतून आणि जगातील विविध अनुभवातून मिळत असते. म्हणूनच आपल्या काळजात ,विचारात काय याचा शोध घ्या,आणि जे करायचे ते दमदारपणे करा. ज्याच्यात कामाचा दम नसतो तो कूचकामी असतो. आपण आयुष्य सुंदर आणि आनंदी करायचे असेल तर कला शाखेत आपल्या आवडीनुसार विषय घ्या , कला कौशल्ये आत्मसात करा आणि अतिशय मंगलमय जीवन जगा !
आणि मग चालू दे .. झुंजार माणसा झुंज दे !



*लेखन
*प्रा.डॉ.सुभाष वाघमारे*
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख,पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र
प्रसिद्धी विभागप्रमुख,छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा)
भ्रमणध्वनी - 9890726440 

*लेख प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close