जावेद शेख / राहुरी
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहीनी समजले जाणारे २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात आज २५ हजार दशलक्ष घनफूट (९६ टक्के) पाणी जमा झाले असल्याने धरणाच्या सांडव्यातून दिड हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात होत असलेल्या विसर्गाने नदीकाठच्या जनतेला दक्षतेचा इशारा दिला आहे.
आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातील एकूण पाणीसाठा २५ हजार दलघफु इतका होत आहे. मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा २४ हजार ८८५ दलघफु इतका नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्ये १ हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यांत येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुळा नदीकाठच्या गावांना या प्रकटनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111