क्रिकेट हा केवळ चौकार-षटकारांचा खेळ नाही; तो धैर्य, संयम, चिकाटी आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असतो. अनेक खेळाडूंना मैदानावरील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मोठी लढाई नशिबाशी आणि निवड प्रक्रियेशी लढावी लागते. भारतीय क्रिकेटमधील अशीच एक संघर्षमय कथा म्हणजे संजू सॅमसन याची. कधीकाळी संघात स्थानासाठी झगडणारा हा खेळाडू आज पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने दाखविलेल्या कामगिरीमुळे आता एक प्रश्न चर्चेत आहे— सुर्यकुमार यादव नंतर भारतीय ट्वेंटी ट्वेंटी संघाचे नेतृत्व कोण करणार ? या प्रश्नाचे एक ठोस उत्तर म्हणून संजू सॅमसनचे नाव पुढे येताना दिसत आहे.
संघर्षातून घडलेला खेळाडू : -
सॅमसनकडे प्रतिभेची कमतरता कधीच नव्हती. त्याच्या फलंदाजीत सहजता, अचूक फटक्यांची वेळ साधण्याची कला आणि धाडसी वृत्ती दिसते. परंतु त्याच्या कारकिर्दीचा प्रवास सरळ नव्हता. कधी संघात स्थान, कधी फलंदाजीची क्रमवारी, तर कधी निवड समितीचे प्रयोग यामुळे त्याला सातत्याने संधी मिळाली नाही. अनेक खेळाडू अशा परिस्थितीत नाराजी व्यक्त करतात किंवा वाद निर्माण करतात. पण सॅमसनने वेगळा मार्ग स्वीकारला. तो शांत राहिला आणि आपल्या खेळावर मेहनत करत राहिला. याच शांततेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद दिसून येते.
विश्वचषकापूर्वीची निराशा : -
२०२६ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघात सलामीच्या स्थानासाठी मोठी स्पर्धा होती. ईशान किशनचे पुनरागमन झाले होते, तर अभिषेक शर्मा याला आक्रमक सलामीवीर म्हणून संधी दिली जात होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सॅमसनची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने वेगळ्या संयोजनावर भर दिला आणि सॅमसनला सुरुवातीला संघाबाहेर बसावे लागले. त्या वेळी अनेक तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला की सॅमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कदाचित येथेच थांबेल. परंतु क्रिकेटमध्ये परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही.
संधी मिळाली तेव्हा दिले उत्तर : -
स्पर्धेच्या सुरुवातीला सॅमसनला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो राखीव खेळाडू म्हणून बाजूला बसून संघाचा खेळ पाहत होता. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने केवळ आठ चेंडूत बावीस धावा करत आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. ही छोटी खेळी असली तरी त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, सॅमसन सज्ज आहे. तरीही पुढील सामन्यात त्याला पुन्हा संघाबाहेर ठेवण्यात आले.
झिम्बाब्वेविरुद्ध ठोस सुरुवात : -
भारतीय फलंदाजी काही सामन्यांत अडखळत असल्याने व्यवस्थापनाने झिम्बाब्वेविरुद्ध सॅमसनला पुन्हा संधी दिली. त्या सामन्यात त्याने पंधरा चेंडूत चोवीस धावा केल्या. आकडे मोठे नसले तरी त्याने अभिषेक शर्मा सोबत जलद धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. ही खेळी व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरली.
वेस्ट इंडिजविरुद्धचा पराक्रम : -
सॅमसनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा क्षण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आला. भारतासमोर १९६ धावांचे आव्हान होते. सुरुवातीलाच अभिषेक आणि ईशान किशन बाद झाल्याने संघ अडचणीत आला. तेव्हा संजू सॅमसनने जबाबदारी स्वीकारली. त्याने सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि नंतर आक्रमक फटके खेळत धावगती वाढवली. त्याने सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा व शिवम दुबे यांच्यासोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. सॅमसनने पन्नास चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९७ धावा काढल्या. हा डाव केवळ धावांचा नव्हता; तो आत्मविश्वासाचा विजय होता. नंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरूध्द ८९, तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूध्दही ८९ धावांची खेळी साकारत भारतीय विश्वविजेतेपदाचा शिल्पकार तर बनलाच पण मालिकावीराचा किताब मिळवून त्याने सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का देत थेट संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार म्हणून चर्चेत आला.
नेतृत्वाची क्षमता : -
सॅमसन केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे तर नेतृत्वगुणांसाठीही ओळखला जातो. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून त्याने संयमी आणि विचारपूर्वक नेतृत्व केले आहे.
त्याच्या नेतृत्वात काही ठळक गुण दिसतात:
दबावाच्या क्षणी शांत राहण्याची क्षमता.
तरुण खेळाडूंना संधी देण्याची वृत्ती.
आक्रमक पण संतुलित रणनिती.
हे गुण भविष्यात भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकतात.
सूर्यानंतरचा पर्याय ?
सध्या भारतीय टी ट्वेंटी षटकांच्या संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करत आहे. परंतु पुढील काही वर्षांत नेतृत्वाची जबाबदारी कोण सांभाळेल हा प्रश्न उपस्थित होतो.
सॅमसनकडे त्या भूमिकेसाठी काही महत्त्वाचे गुण आहेत:
कर्णधार म्हणून स्पर्धेचा अनुभव.
धाडसी फलंदाजी.
संघातील लोकप्रियता.
दबावाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता.
जर त्याने अशीच सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली, तर तो भारतीय टटी ट्वेंटी संघाचा भावी कर्णधार होऊ शकतो.
संजू सॅमसनचा प्रवास हा संघर्ष, संयम आणि आत्मविश्वासाचा प्रवास आहे. कधीकाळी संघात स्थानासाठी झगडणारा हा खेळाडू आज भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची फलंदाजी आता केवळ धावा करत नाही; ती टीकाकारांना ठाम उत्तर देत आहे. जर त्याने हीच लय कायम ठेवली, तर भविष्यात भारतीय क्रिकेटला एक नवा नेता मिळू शकतो. सूर्यकुमार यादव नंतर भारतीय टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे गेल्यास कोणी आश्चर्य मानू नये. शेवटी असे म्हणावे लागेल की, टी ट्वेंटी विश्वचषकाने संजूच्या आयुष्याला नाट्यमयरित्या कलाटणीच दिली.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

