अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कर्जत येथे ५ एप्रिल रोजी होणाऱ्या साहित्यरत्न, सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार शब्दगंधचे संस्थापक व सचिव सुनील गोसावी यांनी संपादित केलेल्या ‘क्रांतीदीप : कॉ. बाबा आरगडे’ या गौरवग्रंथास जाहीर झाला आहे, अशी माहिती कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष तानाजी डाडर यांनी दिली.
शब्दगंध प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या गौरवग्रंथात कॉ. बाबा आरगडे यांच्या कार्य व व्यक्तिमत्त्वावर विविध मान्यवरांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. या ग्रंथाचे संपादन सुनील गोसावी यांनी केले असून मुखपृष्ठ रचना सतीश कुलकर्णी यांनी तर संगणकीय अक्षरजुळवणी श्रीपाद कुलकर्णी यांनी केली आहे.
सदर संमेलन कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ कवी व माजी आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी विद्रोही कवी नितीन चंदनशिवे, प्रा. मच्छिंद्र सकटे, प्रा. शरद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
या यशाबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कॉ. सुभाष लांडे पाटील, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रमोद देशपांडे, प्रा. डॉ. मिलिंद कसबे, तसेच सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक संपतदादा बारस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुनील गोसावी यांचे अभिनंदन केले आहे.
000

