'देवा पैलवान', माजी उपसरपंच ते समाजसेवक… अण्णांच्या कार्याचा गौरव सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे प्रतिनिधी: ( दिलीप घरटे )
गावाच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे, पैलवानकीत नावलौकिक मिळवणारे आणि समाजकारणात निष्कलंक कार्य करणारे आदरणीय देविदास जयराम रायते (अण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोठ्या उत्साहात भव्य सत्कार सोहळा पार पडला.
अण्णांचा जीवनप्रवास हा खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे. न्याहलोद पंचक्रोशीतच नव्हे तर नाशिक विभागात “देवा पैलवान” म्हणून ओळख निर्माण करत त्यांनी पैलवानकीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या खेळातील प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळे गावाची ओळख आजही “पैलवानांचे गाव” अशीच आहे. त्यांच्या आदर्शामुळे शेकडो युवकांनी तालमीचे धडे घेतले आणि पोलीस व संरक्षण विभागात आपले कर्तृत्व सिद्ध केले.
पैलवानकीसोबतच त्यांनी समाजकारणातही मोठे योगदान दिले. तब्बल १५ वर्षे उपसरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम केले. सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी पारदर्शक आणि प्रभावी कारभार केला. तसेच माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या सूतगिरणीत संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी औद्योगिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. गावातील तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच न्याय्य आणि निष्पक्ष भूमिका घेतली, कुणालाही अन्याय होऊ दिला नाही.
अण्णांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि चेहऱ्यावरचे सदैव हास्य. त्यांनी कुटुंब आणि समाज यांच्यात समतोल साधत आदर्श जीवन जगले. त्यांच्या कार्यामुळे आजही गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम आहे.
या सत्कार सोहळ्यावेळी प्रसिद्ध पत्रकार विशाल रायते, साई संस्थान कर्मचारी उद्धव जिरे, अल्पसंख्यांक नेते नासिर पठाण, नामवंत पैलवान ज्ञानेश्वर भोगे, रावसाहेब भोगे, राहुल शेटे, बबलू धोबी, राहुल गुरव, प्रमोद शिरसागर, साई रायते, समर्थ जिरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांना हार, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरामय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,
अण्णा मामा म्हणजे आमच्यासाठी फक्त व्यक्ती नाहीत, तर एक चालतं-बोलतं विद्यापीठ आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कष्ट, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजासाठी जगण्याची खरी प्रेरणा मिळते. पैलवानकीत त्यांनी नाव कमावलं, पण माणुसकीत त्यांनी मनं जिंकली. गावासाठी त्यांनी केलेली निस्वार्थ सेवा ही आमच्यासाठी आदर्श आहे. अण्णांसारखे व्यक्तिमत्त्व प्रत्येक पिढीला दिशा देणारे असते. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा, हीच आमची सर्वांची इच्छा आहे.
आदरणीय देविदास जयराम रायते (अण्णा) यांचा जीवनप्रवास हा निस्वार्थ सेवाभावाचा जिवंत आदर्श आहे. तब्बल १५ वर्षे उपसरपंच पदावर कार्यरत राहूनही त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. सत्तेचा उपयोग स्वतःसाठी न करता, गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठीच केला. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असताना देखील त्यांनी एकही रुपया स्वतःसाठी कमावला नाही, ही गोष्ट त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शकतेची साक्ष देते. त्यांनी नेहमीच न्याय, सचोटी आणि माणुसकी या मूल्यांना प्राधान्य देत प्रत्येक निर्णय घेतला. म्हणूनच आज त्यांच्या कार्याकडे पाहिले की, ते केवळ पद भूषवणारे नव्हते, तर त्या पदाला मान मिळवून देणारे खरे लोकनेते होते. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळेच ते आज प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आहेत.

