जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
१९४७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरेसा मजबूत असता तर निश्चितच संघ देशाची फाळणी टाळू शकला असता, अशा आशयाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. आंबेकर यांनी व्यक्त केलेल्या मतातील वास्तव एकदमच नाकारता येत नाही.
१९४७ मध्ये देशाची झालेली फाळणी ही दुर्दैवीच होती. एका व्यक्तीच्या सत्तालालसेसाठी ही फाळणी करण्यात आली होती. इंग्रजांनाही तेच हवे होते. या देशावर राज्य करताना आधीच्याच विशालकाय हिंदुस्थान या देशाचे इंग्रजांनी छोटे छोटे तुकडे केले होतेच. त्यांनी आधी श्रीलंका, ब्रह्मदेश म्हणजेच आजचे म्यानमार, अफगाणिस्तान, नेपाळ, यांना वेगळे केले होतेच. शिवाय त्यांनी देशाला स्वातंत्र्य देताना भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. त्यावेळी हिंदूंसाठी भारत तर मुसलमानांसाठी पाकिस्तान असे विभाजन झाले होते. त्यामुळे आजच्या पाकिस्तान मध्ये त्यावेळी वसलेले हिंदू बांधव अक्षरशः बेघर करून हाकलले गेले. कित्येकांचे जीव घेतले गेले, तर अनेक आया बहिणींची अब्रू लुटली गेली. असे म्हणतात की त्यावेळी पेशावर लाहोर या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हिंदूंची प्रेते अक्षरशः रचून पाठवली जात होती, इतका क्रूर हिंसाचार त्यावेळी हिंदूंवर करण्यात आला होता.
मात्र त्यावेळी भारताचे तत्कालीन राज्यकर्ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे मार्गदर्शक महात्मा गांधी यांनी या देशात असलेल्या मुस्लिमांना अभय दिले होते. त्यामुळे हिंदूंसाठी भारत आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान या तत्त्वाला तिथेच तिलांजली दिली गेली होती. आपल्या देशात मुस्लिम मोठ्या संख्येने राहिले आणि तत्कालीन राज्यकर्त्यांनी मतांसाठी त्यांचे केलेले लांगुलचालन बघता ते अक्षरशः शेर बनले होते. आजही त्यांची दादागिरी सुरूच आहे.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच पाकिस्तानने काश्मीरमध्ये लष्कर घुसवून त्यातील काही भाग आपल्या ताब्यात घेतला होता. तो भाग तत्कालीन नेतृत्वाच्या बोटचेप्या धोरणामुळे आजही पाकिस्तानच्याच ताब्यात आहे, आणि आजही पाकिस्तान हा भारताशी शत्रुत्व ठेवूनच वागतो आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या माध्यमातून आजही पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणतोच आहे. दरम्यानच्या काळात पाकिस्तानचे देखील दोन तुकडे झाले असून पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन देश झाले आहेत. भारताच्या सहकार्यामुळेच बांगलादेश स्वतंत्र झाला तरीही बांगलादेश देखील भारताशी शत्रुत्व ठेवूनच आहे.
देशाची फाळणी झाली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फारसा मजबूत नव्हता हे वास्तव नाकारता येत नाही. संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. म्हणजे १९४७ मध्ये संघ स्थापन होऊन जेमतेम २२ वर्षे झाली होती. संघ स्थापन झाला त्यावेळी देशात इंग्रजांचे राज्य होते. संघाची स्थापना हिंदूंचे रक्षण करण्यासाठी म्हणूनच हिंदूंना संघटित करावे या हेतूनेच झाली होती. त्यावेळी इंग्रज सरकारचे धोरण हे मुस्लिमधार्जिणेच होते. त्यामुळे संघाला इंग्रज सरकारकडून फारसे सहकार्य मिळणे शक्यच नव्हते. त्यावेळी देशात काँग्रेसी विचारांचा जोर होता. शिवाय समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदूंसाठी हिंदू महासभा ही देखील सक्रिय होती. अशा परिस्थितीत अवघ्या २२ वर्षात संघ पुरेसा मजबूत होणे ही अशक्यप्राय बाब होती. त्यातही त्या काळात स्वातंत्र्यलढा चालू होता. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांचे तिकडेच लक्ष होते. संघ स्वयंसेवक देखील तत्कालीन सरसंघचालकांच्या परवानगीनेच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. सुरुवातीला संघाची स्थापना ही फक्त तरुणांसाठी म्हणून झाली होती. नंतर १९३६ साली महिलांसाठी म्हणून राष्ट्र सेविका समितीची स्थापना करण्यात आली. ती देखील संघ विचारांवरच आधारित अशी करण्यात आली होती. मात्र या दोन्ही संघटना पुरेशा सक्षम नव्हत्या. संपूर्ण देशात त्यांचे काम पोहोचलेही नव्हते. अशावेळी फाळणीला विरोध करणे आणि त्यासाठी जनमत जागृत करणे हे संघाला शक्य होणार नव्हते.
त्यामुळेच फाळणी झाली आणि पाकिस्तानातून अनेक हिंदूंना विस्थापित होऊन भारतात परत यावे लागले. जरी संघ त्यावेळी मजबूत नव्हता तरी त्यावेळी पाकिस्तान परिसरात जाऊन तिथल्या विस्थापितांना धीर देणे आणि त्यांना मदत करून भारतात आणणे हे काम संघ स्वयंसेवकांनी केले होते. सुनील आंबेकरांनीच सांगितल्यानुसार त्या काळात संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका मावशी केळकर हे दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या पाकिस्तान मध्ये ठाण मांडून बसले होते आणि जास्तीत जास्त हिंदूंना मदत करण्याचे काम त्यांनी केले होते.
त्यावेळी संघ पुरेसा मजबूत नव्हता. त्यांचे कार्य फक्त संघ शाखेच्या मैदानापुरतेच मर्यादित होते. मात्र १९४८ मध्ये संघावर आलेली बंदी १९४९ मध्ये उठल्यानंतर संघाने आपली धोरणे बदलून समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मग राजकारणात भारतीय जनसंघ (आजचा भारतीय जनता पक्ष) कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सहकार क्षेत्रात सहकार भारती, धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद, वनवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये संघाने आपल्या संघटना उभ्या केल्या. त्यात शिक्षण, साहित्य, पत्रकारिता ही क्षेत्रे देखील सोडली नव्हती. इतकेच काय पण त्या काळात उच्चभ्रूंसाठी असलेल्या रोटरी आणि लॉयन्स या संघटनांच्या धर्तीवर भारत विकास परिषद देखील संघाने गठीत केली होती. अशा जवळजवळ ४० क्षेत्रांमध्ये संघाने आपले काम उभे केले. त्याशिवाय विविध सामाजिक संस्था, बँका सोसायट्या, शैक्षणिक संस्था येथेही संघाने आपले स्वयंसेवक सक्रिय केले आणि त्यायोगे देशभरात संघ विचार रुजवला. त्यामुळेच आज संघ विचार देशभरात रुजला गेला असून संघाबद्दल जनसामान्यांच्या मनात असलेले गैरसमज देखील बऱ्याच प्रमाणात दूर झालेले आहेत. आज केंद्रात आणि ३६ पैकी जवळजवळ २० राज्यांमध्ये संघ विचाराची सत्ता स्थापित झालेली आहे. हे बघता आज शंभर वर्षांचा झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशात पुरेशा मजबूत स्थितीत आहे असे म्हणता येऊ शकते.
इथे आणखी एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे. संघाची स्थापना १९२५ साली झाली. त्याच वर्षी या देशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना देखील झाली होती. आज देशात केंद्रात आणि अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये संघ विचाराचे लोक सत्तेत आहेत, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या हातातील शेवटले राज्य केरळ हे ही गमावलेले आहे. भविष्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा रात्रीच्या वेळी अंधारात दिवा लावून शोधावा तसाच शोधावा लागणार आहे.
फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची नाही, तर १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाचीही अवस्था फारशी वेगळी नाही. मधली दहा वर्ष हा पक्ष देशाला सत्ता तर सोडा पण विरोधी पक्षनेता सुद्धा देऊ शकला नव्हता. समाजवादी पक्ष आणि हिंदू महासभा आज कुठेही अस्तित्वात नाहीत. मात्र संघ वाढत वाढत १०० वर्षाचा झाला आहे आणि सुनील आंबेकरांनीच सांगितल्यानुसार जागतिक पातळीवर देखील संघ आपला विचार पोहोचवतो आहे. हे बघता संघ आता खरोखरीच मजबूत झाला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.
देशाची फाळणी झाली त्यावेळी संघ मजबूत नव्हता. त्यामुळे संघ फाळणी थांबवू शकला नाही हा मुद्दा नाकारता येणार नाहीच. त्या फाळणीचे झालेले दुष्परिणाम हा देश आणि विशेषतः या देशातील हिंदू आजही भोगत आहेत. अशावेळी देशाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघ आता काय करू शकेल आणि काय करणार आहे हे बघण्याच आता महत्त्वाचे ठरते.
आपल्या दीडशे वर्षांच्या राजवटीत इंग्रजांनी या देशाचे श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्थान, आणि आजचा भारत असे तुकडे केले. आज ७० वर्षांनी हे सर्व देश पुन्हा एकत्र आणून पूर्वीचा अखंड हिंदुस्थान निर्माण करणे आजची राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती बघता शक्य होईल असे चित्र नाही. कारण त्यात जागतिक महाशक्तींचे हितसंबंधही गुंतलेले असू शकतात. मात्र काही वर्षांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इंग्लंड, अमेरिका किंवा सोवियत रशिया सारखा भारतीय महासंघ स्थापन करावा अशी सूचना केली होती. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हरकत नसावी.
डॉ. भागवतांच्या संकल्पनेनुसार भारत, श्रीलंका, म्यानमार, बंगलादेश, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा एक भारतीय महासंघ गठीत केला जावा. या सर्व देशांमध्ये त्यांची त्यांची सरकारे स्वतंत्र आणि स्वायत्त असावी, मात्र काही मुद्द्यांवर हे सर्व देश एकत्र राहावे. विशेषतः या सर्व देशांमध्ये समान चलन असावे. या देशांमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी फक्त पासपोर्ट असला तर पुरेसा, बाकी व्हिसाची वगैरे गरज नसावी. या सर्व देशांची मिळून एक लष्करी यंत्रणा असावी जेणेकरून प्रत्येक देशाचा लष्करावरचा खर्चही कमी होईल, आणि सुरक्षा सांभाळली जाईल. या देशांमध्ये व्यापार आणि व्यवहार मुक्त असावे, तसेच इतर अनेक मुद्द्यांवर देखील एकमत केले जाऊ शकेल असे सरसंघचालकांनी त्यावेळी सुचवले होते.
सरसंघचालकांची ही सूचना निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल. मात्र त्यात अडचणी बऱ्याच येऊ शकतात. मुळातच भारत, नेपाळ आणि श्रीलंका वगळता म्यानमार, बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्येने आहे. त्यातही पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन देश भारतविरोधावरच आणि भारत द्वेषावरच उभे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना भारतासोबत एकत्र आणणे शक्य होईल का? आणि शक्य झाले तरी ते एकत्र नांदतील का? हा देखील प्रश्न अभ्यासक उपस्थित करू शकतात.
आज भारतात रहिवासी असलेले मुसलमान तसेच बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये असलेले मुसलमान हे बहुसंखेत मूळचे हिंदूच आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. हिंदुस्थानात राहतो तो मग कोणत्याही जाती धर्माचा असो, तो हिंदूच असेल, आणि हिंदुत्व हा धर्म नसून ती संस्कृती आहे अशी संघाची भूमिका आ,हे हे सरसंघचालक आणि संघाचे इतर अधिकारी वेळोवेळी स्पष्ट करत असतातच. साधारणपणे आठव्या किंवा नवव्या शतकात उत्तरेकडून मुस्लिम आक्रमक भारतात आले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर इथली राज्य जिंकली. त्यावेळी इथे छोटी छोटी राज्य होती. ती संघटित नव्हती. त्याचाच फायदा घेत मुस्लिम पुढे सरकत गेले आणि एका काळात तर त्यांनी संपूर्ण देशावर आपले राज्य प्रस्थापित केले होते. त्यांनी तलवारीच्या जोरावर जसे राज्य जिंकले तसेच तलवारीचा धाक दाखवून बहुसंख्य हिंदूंना बाटवून मुसलमान देखील केले होते. आज भारत, पाकिस्तान, बांगलादेश येथील बहुसंख्य हे मुस्लिम हे मुळचे हिंदूच आहेत, याचे इतिहासात दाखले मिळू शकतील. नुकतेच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी देखील माझे पूर्वज हे हिंदूच होते असे विधान केले आहे. इतरही मुस्लिमांनी जर आपल्या पूर्वजांचा इतिहास तपासला तर ते मूळचे हिंदूच होते असे लक्षात येईल.
विशेष म्हणजे या सर्वच परिसराची भौगोलिक स्थिती एकसारखीच आहे. त्यामुळे संस्कृती देखील फारशी वेगळी नाही. तिथे जो काही आहे तो फक्त हिंदूंचा द्वेष, तो जर कमी होऊ शकला तर परिस्थिती बदलू शकते. मात्र त्यासाठी प्रयत्न बरेच करावे लागणार आहेत.
आतापर्यंत भारतात हिंदूंना तलवारीच्या जोरावर बाटवून मुसलमान केले गेले. अजूनही वेगवेगळ्या प्रकारांनी असे बाटवणे सुरूच आहे. नुकतेच नाशिक आणि परतवाडा येथे घडलेले प्रकार या दाव्याला पुष्टी देतात. त्याला कारण आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांचे बोटचेपे धोरण हे देखील होते. मात्र आता हळूहळू कायदे बदलत आहेत, आणि प्रशासनाची मानसिकता देखील बदलते आहे. त्यामुळे त्यावर प्रतिबंध देखील लागणे सुरू झाले आहे. आतापर्यंत अशा प्रकारे हिंदूंना बाटवून मुस्लिम करून घेणे शक्य होण्यामागचे कारण असे होते की हिंदू संघटित नव्हते. ते जातीपातींमध्ये वाटले गेले होते. त्याचाच फायदा त्यावेळी आधी मुस्लिमांनी आणि मग ख्रिश्चनांनी घेतला होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांमुळे देशात जो राम मंदिराचा मुद्दा १९८७-८८ मध्ये उचलायला गेला आणि तो सतत जागता ठेवला गेला. त्यामुळे हिंदू संघटित झालेले आहे. त्याचे प्रत्यंतर राम मंदिर उभारणीत दिसून आले आहे. त्याचसोबत २०१४ पासून निवडणुकांमध्ये देखील जे निकाल येत आहेत ते देखील बोलके आहेत.
मात्र प्रशासनात आणि वैचारिक समूहांमध्ये आजही बुद्धिभेद करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातही या बुद्धिभेद करणाऱ्यांना हिंदू हे कायम सॉफ्ट टारगेट वाटत आलेले आहे. त्यांना देश आधी इंग्रजांचे पाठबळ होते. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन काँग्रेसचे सरकारांचे पाठबळ राहिले. त्यामुळे चुकीचा इतिहास लिहिला गेला आणि चुकीची श्रद्धास्थळे प्रस्थापित केली गेली. मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे. बॉम्बेचे मुंबई झाले आहे, तर हैदराबादचे भाग्यनगर, औरंगाबादचे संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर देखील झाले आहे. असे अनेक ठिकाणी सकारात्मक बदल होत आहेत, आणि त्यामुळे हिंदूंची मानसिकताही बदलते आहे. शिवाय देशातील वैचारिक समूहांवर चे डाव्यांचे वर्चस्व होते ते देखील कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहे. त्यामुळेच आता शहरी नक्षलवादाला सुद्धा चोख उत्तर दिले जात आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर आता देशातील हिंदूंची ताकद हळूहळू वाढते आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरु नये. ही ताकदच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अधिकाधिक मजबूत करत जाणार आहे , आणि या ताकदीच्या जोरावरच सरसंघचालकांनी सुचवल्यानुसार भारतीय महासंघाच्या गठनासाठी पावले उचलली जाऊ शकतात.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी आपण मूळचे हिंदूच आहोत असे विधान करणे हा एक शुभ संकेत मानायला हवा. आता हाच धागा पकडून जर विचार परिवर्तन घडवता आले आणि या सर्वच प्रदेशांमध्ये जो भारत द्वेष भिनवला गेला आहे तो कमी करता आला तर भारतीय महासंघाच्या वाटचालीच्या दृष्टीने पुढे पावले टाकता येऊ शकतात.
त्यासाठी सुरुवात आपल्याला आपल्या देशापासूनच करावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भारतीय जनता पक्षाची या देशात समान नागरी कायदा हवा ही दीर्घ काळापासून प्रलंबित मागणी आहे. जर समान नागरी कायदा लागू झाला तर बरेच प्रश्न सुटू शकतील असे मानता येईल. जोवर या देशातील मुस्लिम हे आपण हिंदुस्थानचे नागरिक म्हणजे हिंदूच आहोत हे मानणार नाहीत, तोवर पुढे जाणे शक्य होणार नाही. मात्र समान नागरी कायद्याने काम सोपे होऊ शकेल. त्याशिवायही इतर अनेक पावले देशातच उचलावी लागतील. आज आपले लष्करी सामर्थ्य दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचा पुरेसा धाकही या शेजारी राष्ट्रांच्या मनात निर्माण करावा लागेल. जागतिक स्तरावर आज भारताने निश्चित असे आपले स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी जर भारतीय महासंघ स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर जागतिक महाशक्ती त्यात हस्तक्षेप करतील यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे या जागतिक महाशक्तींना देखील तुम्हाला दाबून ठेवावे लागेल आणि त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप टाळावा लागेल. आज अमेरिकेसोबत चीन देखील पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करतो आहे त्याचाही योग्य बंदोबस्त करावा लागेल. त्याचप्रमाणे आज अमेरिकेसोबत राहून आपण जी प्रगती करतो आहोत त्यापेक्षा जास्त प्रगती भारतासोबत राहून आपण करू शकू आणि आपल्या देशातही शांती सौहार्द नांदेल, हा विश्वास तिथल्या नागरिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण करावा लागेल. तुमची पुरेशी स्वायत्तता कायम ठेवून आपण जर एक आलो तर त्यात सगळ्यांचे हित आहे हा मुद्दा त्यांना पटवून द्यावा लागेल. तसे झाले तरच हे सरसंघचालकांचे स्वप्न साकार होऊ शकेल.
मात्र हे अशक्य नसले तरी याची वाट खडतर जरूर आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरेसा मजबूत झालेला आहे आणि अजूनही संघ वाढतोच आहे. त्याचा फायदा घेत संघाने आज पावले उचलली तर भविष्यात अखंड हिंदुस्तान जरी नाही तरी भारतीय महासंघ म्हणून जागतिक क्षितिजावर एक नवी शक्ती उदयाला येऊ शकेल यात शंका नाही.
माझी ही मते मी एक पत्रकार आणि संघ अभ्यासक म्हणून मांडलेली आहेत. मी संघाचा कोणताही अधिकारी किंवा प्रवक्ता नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. ही माझी व्यक्तिगत नाते आहेत.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे.......
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो.
या लेखासंदर्भात वाचकांच्या स्पष्ट आणि परखड प्रतिक्रियांचे स्वागतच होईल.

