जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज २६ मे २०२६, मराठीतील ख्यातनाम साहित्यिक, नाटककार राम गणेश गडकरी यांची १४१ वी जयंती, त्या निमित्ताने आज ठीक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होते आहे.
राम गणेश गडकरी यांनी अत्यंत अल्प आयुष्यात खूप गाजलेली नाटके लिहिली. त्यांच्या आयुष्याचा शेवट नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे झाला. त्यामुळे सावनेर येथे त्यांचे चिरंतन स्मारक व्हावे अशी गडकरी प्रेमींची मनोमन इच्छा होती. त्यासाठी पाठपुरावा देखील चालू होता. अखेर ते स्मारक झालेले आहे. डिसेंबर 1990 मध्ये गडकरींचा अंत सावनेरच्या ज्या घरात झाला ते घर राज्य शासनाने अधिग्रहीत केले आणि तिथेच त्यांचे स्मारक झाले आहे. आज सकाळी या स्मारकासाठी पाठपुरावा करणारे एक गडकरीप्रेमी मित्र राजेश पेंढारी यांच्याशी बोलताना त्यांनीच आज १४१वी जयंती आहे अशी माहिती दिली आणि अजून नऊ वर्षांनी त्यांची दीडशेवी जयंती साजरी होईल असेही सांगितले.
पेंढारींनी हे सांगताच मी भूतकाळात गेलो. १९८४-८५ हे वर्ष राम गणेश गडकरींचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने २६ मे १९८४ रोजी गडकरी भक्तांनी सावनेर येथेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सावनेरचे पत्रकार भास्कर नंदनवार त्यात आघाडीवर होते. तिथे विदर्भातील बरेच मान्यवर साहित्यिक जमणार होते. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा नागपूरातील वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. सावनेर येथे होणारा कार्यक्रम आणि त्याच दिवशी संध्याकाळी गडकरींच्या स्मृती प्रित्यर्थ नागपूरच्या धनवटे रंग मंदिरात होणारा कार्यक्रम, दोन्हीचे मी चित्रीकरण करावे आणि दूरदर्शनला पाठवावे अशा सूचना मला आल्या होत्या. सावनेरचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता होता. इतक्या सकाळी सावनेरला पोहोचायचे कसे हा विचार डोक्यात चालू होता. स्कूटरने जायचे तर कुणीतरी सोबत घ्यावे असा विचार केला. अचानक त्याच दिवशी संध्याकाळी माझा मित्र सुधीर पाठकची भेट झाली. सुधीर त्यावेळी तरुण भारतात वार्ताहर म्हणून काम करत होता. त्यालाही सावनेरला याच कार्यक्रमासाठी जायचे होते. मग आपण दोघेही स्कूटरने जाऊया कसे आम्ही ठरवले. त्यावेळी मी माझी जुनी लॅबरेटा स्कूटर पेंटिंग डेंटिंग करून आणि सर्व जुने पार्ट्स बदलून पूर्णतः नवीन करून घेतली होती. ती स्कूटर घेऊन जाऊया असे आमचे ठरले.
ठरल्याप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता मी स्कूटरला माझ्या कॅमेऱ्याची बॅग लावून तरुण भारत ऑफिस समोर पोहोचलो. सुधीर तिथे तयारच होता. तेव्हा त्या दिवशीचा तरुण भारतचा अंक छापून आला होता. सुधीर तो अंकच बघत होता. मी पोहोचताच स्कूटर थांबवली आणि त्याच्या हातातील अंक बघू लागलो. मग माझी स्कूटर सुधीरनेच ताब्यात घेतली आणि मला सांगितले "अव्या तू मागे बसून पेपर वाच. मी गाडी चालवतो" आणि हळूहळू आम्ही सावनेरच्या दिशेने निघालो. छिंदवाडा रोडने स्कूटर नागपूर बाहेर गेल्यावर हळूहळू वातावरणातील उष्मा कमी जाणवू लागला होता. कोराडीचे थर्मल पॉवर स्टेशन आणि मंदिर ओलांडल्यावर तर वातावरण अजूनच प्रसन्न वाटत होते. सुधीरच स्कूटर चालवत होता आणि मी मागे बसून गप्पा मारत होतो.
सावनेर जसे जवळ येऊ लागले तसे मागून एक एक वाहन येताना दिसू लागले. एका कारमधून रंजन दारव्हेकर आणि ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर हे येताना दिसले. दारव्हेकर मास्तर त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. दुसऱ्या एका वाहनातून विदर्भ साहित्य संघाचे राम शेवाळकर, मनोहर म्हैसाळकर, वामनराव तेलंग अशी सर्व मंडळी दिसली. अजून एका वाहनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे त्यावेळचे नागपूरचे उपसंचालक प्रभाकर भुसारी, मुंबईचे वरिष्ठ उपसंचालक वसंत चौधरी आणि इतर मंडळी दिसली. सर्वांनी आम्हाला हात दाखवत आपल्या गाड्या पुढे दामटल्या होत्या.
सावनेरला सिताराम महाराजांच्या मठापासून गडकरी जन्मशताब्दीची सुरुवात करणारी ग्रंथ दिंडी सुरु होणार होती. आम्ही तिथे पोहोचलो तर सर्व मंडळी गोळा झालेलीच होती. नागपूरहून काही पत्रकार मित्र सुद्धा तिथे पोहोचले होते. दिंडीची तयारी होत आली होती. मग एका पालखीत गडकरींचे छायाचित्र आणि त्यांचे ग्रंथ ठेवले गेले. त्याचे विधिवत पूजन झाले आणि एका बाजूने दारव्हेकर मास्तर आणि दुसऱ्या बाजूने राम शेवाळकर अशी दोघांनीही ती पालखी उचलली आणि खांद्यावर घेतली टाळ मृदंगांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली.
दिंडी सोबत टाळ मृदुंगाच्या तालावर सर्वच गडकरीभक्त नाचत होते दिंडीत सहभागी झालेल्या महिलांनी फेर धरला होता, तर काही महिलांनी उघड्या घालायला सुरुवात केली होती. टाळ मृदंगाच्या तालावर नाचणाऱ्यांमध्ये नागपुरातून आलेला रंजन दारव्हेकर हा देखील आघाडीवर होता. तू काही वेळ चक्क माहिती खात्याच्या जीपवरही चढून उभा राहिला होता. मी या सर्वच दृश्यांचे चित्रीकरण करत होतो. तितक्यात कोणीतरी सांगितले की मागे राम शेवाळकर आणि माहिती उपसंचालक प्रभाकर भुसारी यांनीही फुगडी घातली आहे. मी मागे गेलो तोवर त्यांची फुगडी आटोपली होती. सहाजिकच होते, दोघांचीही वय लक्षात घेता जास्त वेळ फुगडी घालणे त्यांना शक्य होणार नव्हते. मी तिथे पोहोचलो तर भुसारी मला म्हणाले, "आता मी आणि शेवाळकर साहेबांनी फुगडी घातली, त्याचा शॉट घेतला की नाही?" तेव्हा मी उत्तरलो "मी समोर तिथे महिलांनी फेर धरला होता आणि फुगडी घातली त्याचे चित्रीकरण करत होतो" त्यावर आपल्या मिश्किल शैलित राम शेवाळकर उत्तरले "चालायचं महिलांचे फोटो काढायचं वय आहे अविनाशचं, काढू द्या. त्यावेळी गोरामोरा होण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. तिथे सोबत असलेले नागपूरचे दोन पत्रकार सुधीर पाठक आणि प्रवीण बर्दापूरकर हे दोघेही माझी चेष्टा करू लागले होते.
हळूहळू दिंडीने विशाल स्वरूप धारण केले होते. गावातील सुबुद्ध मंडळी दिंडीत सहभागी होऊ लागली होती. रस्त्यात ठिकठिकाणी दिंडीवर फुले उधळले जात होती. हळूहळू दिंडी सावनेरच्या मुख्य रस्त्याला लागली. थोडी पुढे गेल्यावर ज्या घरात राम गणेश गडकरींचा अंत झाला होता, त्या घरी दिंडी पोहोचली त्यावेळी ते घर आदमाने नामक वकिलांच्या मालकीचे होते. मात्र तिथे त्यावेळी कोणीच राहत नव्हते. स्थानिकांच्या विनंतीवरून ते घर त्यादिवशी उघडले गेले होते. उपस्थितांनी त्या घरात फेरफटका मारला आणि मग पुन्हा दिंडी परत निघाली.
सावनेरच्या प्रमुख रस्त्यावरून फिरून ते दिंडी मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका सभागृहात पोहोचली. त्या ठिकाणी झालेल्या सभेत राम शेवाळकरांनी गडकरींचा शेवट या घरात झाला ते घर त्यांचे स्मारक म्हणून सरकारने घोषित करावे अशी मागणी केली. त्यावेळी बोलताना शेवाळकरांनी ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून गडकरींच्या आत्म्याने सरकार दरबारी बसलेल्यांना सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर सुमारे आठ महिन्यांनी याच परिसरात गडकरी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्य शासनाच्या उत्कृष्ट वांङमय पुरस्कारांचे वितरण त्यावर्षी तिथेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री सुधाकरराव नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सावनेर येथे गडकरींचे स्मारक व्हावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. त्याचवेळी बोलताना मध्यंतरी रामभाऊ शेवाळकरांनी स्मारक झाले नाही तर उपोषण करील अशी घोषणा केली होती, असे सांगत रामभाऊंनी उपोषण जरूर करावे त्यांची प्रकृती बघता त्यांना उपोषणाचीच गरज आहे असा खोचक टोलाही हाणला होता.
त्यादिवशी दिंडी आणि सभा आटोपली तोवर सकाळचे साडेदहा वाजत होते. मे चा शेवटचा आठवडा असल्यामुळे ऊन चांगलेच तापायला लागले होते. मग मी आणि सुधीर दोघांनी कान आणि डोके बांधून घेतच स्कूटरवर स्वार झालो. रस्त्यात एका टपरीवर दोघांनीही एक एक प्लेट आलूबोंडा खाल्ला. मग मी चहा तर सुधीरने कॉफी घेतली आणि नागपुरात पोहोचलो. नागपुरात पोहोचलो तोवर दुपारचे बारा वाजत होते.
त्या दिवशी संध्याकाळी धनवटे रंग मंदिरातही गडकरींच्या नाटकातील छोटे छोटे प्रयोग नागपूरकर कलावंतांनीच सादर केले होते. त्यालाही नागपूरकर रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळी देखील राम शेवाळकर आणि दारव्हेकर मास्तर जातीने उपस्थित राहिले होते. एकुणच गडकरींचे जन्मशताब्दी वर्ष या दिवसभराच्या धावपळीने मला चांगलेच लक्षात राहिलेले आहे. आज सकाळी राजेश पेंढारीशी बोलताना त्याने अजून नऊ वर्षांनी गडकरींची ,१५० वी जयंती असल्याचे सांगितले आणि या सर्व जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या...

