आपल्या मुलीवर कोणी नराधमाने बलात्कार केला आहे. अशावेळी आपण तिच्याजवळ उपस्थित राहू शकत नाहीत. त्या आईच्या भावना काय असतील ? प्रत्येक महिलेला प्रचंड दुःख देणारी ही घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावातील मागासवर्गीय मुलीवर झालेल्या बलात्काराची आहे. तसं पाहिलं तर कुठल्याही महिलेवर, मुलीवर ती दलित असो, अथवा सवर्ण तिच्यावर अत्याचार होऊच नये.
आई-वडील दोघेही ऊस तोडणी कामगार. आपल्या बैलगाडीसह दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी करण्यासाठी गेलेले. जाताना आपल्या १४ वर्षाच्या मुलीला शिक्षणासाठी आपल्या आजी जवळ ठेवलेले. धुलीवंदनाच्या दिवशी ही मुलगी आणि तिची मैत्रीण रंग आणण्यासाठी दुकानात जात असताना दोन नराधमांनी तिला पकडले, घरामध्ये बळजबरीने घेऊन गेले. एकाने बाहेरून दाराचे कडी लावली आणि एक जण तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करतो ती ओरडते, विव्हळते नराधम थांबत नाही. मैत्रीण तर केव्हाच घाबरून पळून गेलेली.
ती जीवाच्या आकांताने ओरडते. लोक जमतात आजी लावलेली दाराची कडी उघडते आणि घरातील आपल्या नातीची परिस्थिती पाहून आजीच्या काळजाचे पाणी-पाणी होते. दोघे नराधम पळून जातात. आजी आपल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड करण्यासाठी गेलेल्या आपल्या मुलाला फोन लावते आणि सर्व प्रकार सांगते. त्या बापाची अवस्था फोन ऐकल्यानंतर काय झाली असेल? ती एक बापच समजू शकतो. आईला ही घटना कळल्यानंतर तिचा जीव कासावीस झाला. कधी आपल्या मुलीला कुशीत घेऊन मायेने आधार देते असे तिला झाले. पण आपली बैलगाडी आणि बैलाकडे कोण लक्ष देईल? या काळजीने ती आपल्या पतीला मुलीकडे घरी पाठवते. आणि स्वतः नाईलाजाने काळजावर दगड ठेवून तिथेच राहते.
आपले वडील घरी आल्यानंतर त्या मुलीची आणि तिच्या वडिलांची काय अवस्था पाहून भोवतालच्या लोकांचे दुःख अनावर होऊन कंठ दाटून आला..
आपल्या पुढील आयुष्याची परवा न करता, इतर मुलींचे आयुष्य बरबाद होऊ नये ही भावना मुलीने व्यक्त केली. आणि आपल्या वडीलाबरोबर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. खरोखर या मुलीला सर्वांनी सलाम केला पाहिजे. तिच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले पाहिजे.
रात्री पाथर्डी मधून आपल्याच एका कार्यकर्त्याचा मला फोन आला साहेब अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती आहे.
फोन ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रचंड कालवा कालव निर्माण झाली. आजूबाजुच्या गावातील नातेवाईकांना फोन करून मी तिच्या वडिलांचा नंबर मिळवला आणि त्यानंतर ही सर्व माहिती मला मिळाली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्मकार संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना फोन करून अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांची भेट घेतली. आणि कुटुंब खूप गरीब आहे साहेब आपण यामध्ये लक्ष घाला अशी विनंती शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्यांना केली. आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी मान्य केल्या.
मुलीला न्याय जर मिळत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असेही त्यांना सांगितले.
काल सायंकाळी ६:३० / ७:०० च्या दरम्यान कंपनीतून घरी गेल्यानंतर मला मुलीच्या वडिलांचा फोन आला. साहेब मी जातो आता ऊस तोडायला. मी म्हणालो निश्चिंत जा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. पुन्हा कोणी काही त्रास दिला तर सांगा. ते म्हणाले हो साहेब, तुम्हाला पहिल्यांदा सांगू.दोन दिवस मी सुद्धा नीटस् जेवण करू शकलो नाही. संवेदनशील मनाच्या माणसाची हीच अवस्था होत असते. मी अजून पर्यंत मुलीच्या वडिलांना भेटलेलो नाही. या सर्व गोष्टी मोबाईल फोनच्या माध्यमातून करता आल्या. वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस त्या नराधमांना अटक केली. आता कायदा त्यांना कधी आणि काय शिक्षा देईल हे माहित नाही. परंतु त्या मुलीच्या बाजूने उभा राहून तिला न्याय मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न करीत आहोत त्यातल्या पहिल्या प्रयत्नाला यश आल्याने मनाला दिलासा मिळाला. समाजामध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत. जी अशा दुःखद प्रसंगाने पिडीत आहेत. त्यांना न्याय मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. पण न्याय कोण, कधी आणि कसा मिळवून देणार? याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. पदरी आलेलं दुःख प्राक्तन म्हणून पचवणं हेच त्यांच्या नशिबी असेल, तर त्यांनी जगावं कसं? त्यांच्या जगण्याला माणुसकीच्या आधाराची नितांत गरज आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या मदतीस धावून गेले पाहिजे.
शिवाजी साळवे
संस्थापक अध्यक्ष :
चर्मकार संघर्ष समिती
(महाराष्ट्र राज्य)
मोबा: 98229 64895
*वृतसंकलन शौकतभाई शेख

