जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
डॉक्टर विश्वास मेहंदळे हे नाव मी अगदी लहान वयातच ऐकले होते. त्यावेळी नागपुरात तरी करमणुकीचे साधन हे फक्त रेडिओ एवढेच होते. त्या काळात रेडिओवरच्या बातम्या आणि त्यातही दिल्लीहून लागणाऱ्या मराठी बातम्या हा नागपूरच्या मराठी माणसांसाठी एक आवर्जून ऐकण्याचा विषय असायचा. त्यावेळी दिल्लीहून सदाशिव दीक्षित, दत्ता कुळकर्णी, गोपाळ मेढेकर असे मराठी वृत्त निवेदक असायचे. त्यातच आणखी एक ऐकलेले नाव विश्वास मेहेंदळे हे होते. अगदी शाळकरी वयातही मेहंदळ्यांनी सांगितलेल्या बातम्या आम्ही कुतूहलाने ऐकायचो.
या विश्वास मेहंदळेंची कधी भेट होईल असे वाटले नव्हते. मात्र त्यांच्या भेटीचा योग सर्वप्रथम १९७७ मध्ये आला. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनमध्ये कंत्राटी पद्धतीने वृत्त छायाचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. विदर्भ हे माझे कार्यक्षेत्र होते. मात्र नियुक्ती झाल्यावर पहिल्यांदाच मी दूरदर्शन केंद्रात गेलो. त्यावेळी तिथले वृत्त छायाचित्रकारांचा विभाग असलेल्या सेंट्रल फिल्म पूलचे प्रमुख मनोहर पिंगळे यांनी माझी विश्वास मेहंदळेंशी ओळख करून दिली. कसे काय तर माहित नाही, मात्र पहिल्याच भेटीत आमचे सूर एकमेकांशी जुळले.
मेहंदळे सर माझ्यापेक्षा जवळजवळ पंधरा-सोळा वर्षांनी ज्येष्ठ होते. मात्र वयाचा किंवा पदाचा अहंकार त्यांच्या वागण्यात सुरुवातीपासूनच मला कधीच जाणवला नाही. इतकेच काय पण माझ्यासारख्या नवोदितांना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात ते योग्य मार्गदर्शन करायचे आणि सांभाळूनही घ्यायचे. मला आठवते १९८९ मध्ये ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अनंत गोपाळ शेवडे यांचे नागपुरात निधन झाले. त्यांच्या जीवनकार्यावर मुंबई दूरदर्शन एक विशेष कार्यक्रम प्रक्षेपित करणार होते. त्याचे मुंबईतून सूत्रसंचालन डॉक्टर गोविंद गुंठे करत होते, तर नागपुरातून सूत्रसंचालन मला करायचे होते. त्यावेळी नागपूर आकाशवाणी कडून शेवडे यांच्या भाषणाची एक टेप मिळवायची तर त्या वेळच्या तिथल्या सहाय्यक केंद्र संचालकांनी काही अडथळे निर्माण केले. वेळ फार थोडा होता त्यावेळी मग आकाशवाणीतूनच मी मुंबई दूरदर्शन ला फोन केला मुंबईतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे मेहंदळे सरांचे सहकारी डॉ. गोविंद गुंठे नेमकी त्यावेळी जाग्यावर नव्हते. फोन मेहेंदळेंनीच उचलला. त्यांना मी अडचण सांगताच ते स्वतः नागपूर आकाशवाणीच्या सहाय्यक केंद्र संचालकांशी बोलले आणि अडचणीतून मार्ग काढला. मग लगेच ती भाषणाची टेप घेऊन मी संध्याकाळच्या विमानाने मुंबईला रवाना केली.
मेहेंदळे सर हे जसे एक उत्कृष्ट वृत्त संपादक होते तसेच उत्कृष्ट वृत्त निवेदकही होते. कोणतीही वेळ आल्यावर काम अडू द्यायचं नाही हे त्यांचे तत्त्व होते. १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. त्यावेळी आकाशवाणीतून मेहंदळ्यांची बदली दूरदर्शन मध्ये झाली. दूरदर्शनच्या पहिल्याच दिवशी मराठी बातम्यांचे वाचन करायचे तर केंद्र संचालकांनी जी वृत्त निवेदिका निश्चित केली होती ती वेळेपर्यंत काही अडचणीमुळे दूरदर्शन केंद्रावर पोहोचू शकली नाही. मग वेळेवर बातम्या कशा जाणार? तेव्हा मेहेंदळे स्वतःच चेहऱ्यावर मेकअप लावून बातम्या वाचायला तयार झाले, आणि पहिल्या दिवशीचे बातमीपत्र त्यांनीच वाचले. हा किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. १९८१ पर्यंत मुंबई दूरदर्शन मध्ये असलेले मेहंदळे सर डेप्युटेशनवर महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालक म्हणून गेले. तिथेही आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. मात्र राजकारणी लोकांशी सूत न जुळल्यामुळे दोन वर्षातच ते दूरदर्शन मध्ये परत आले. तिथे मग दीर्घकाळ ते वृत्तसंपादक म्हणूनच कार्यरत होते. त्या काळात माझा आणि मेहेंदळे सरांचा नियमित संपर्क येत असे, ते स्वतः एक कुशल नट होते उत्कृष्ट निवेदक आणि वक्तेही होते. त्याचबरोबर लेखकही होते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर ते मार्गदर्शन करायला तयार असत. ते फक्त दूरदर्शनसाठी बातम्यांचे संपादन करणे इतकेच काम करत नव्हते, तर बातम्यांशी संबंधित विविध कार्यक्रमांचे ही संयोजन ते करायचे १९८३ मध्ये पुण्यातील गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींना फाशी झाली. तेव्हा फाशी देणे हे अमानवी आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर मेहेंदळे सरांनी एक चर्चात्मक कार्यक्रम दूरदर्शनवर आयोजित केला होता. त्यासाठी नागपूरहून काही सायलेंट शूटिंग करून पाठवायला त्यांनी मला सुचवले होते. त्यावेळी त्यांनी फोनवरूनच मला काटेकोर मार्गदर्शन केले होते.
१९८८ नंतर काही कारणांनी मी दूरदर्शनचे काम थांबवले. त्यामुळे माझा आणि मेहंदळे सरांचा फारसा संपर्क येत नव्हता. मात्र त्या काळात त्यांचा दूरदर्शन वर वादसंवाद हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यादरम्यान एक दोनदा मी त्यांच्याशी फोनवर बोललो देखील होतो. नंतर १९९९ च्या दरम्यान मेहंदळे निवृत्त झाले आणि आमचा फारसा संपर्क उरला नव्हता. २००२ पासून मी एक नियतकालिक सुरू केले. त्याच्या दिवाळी अंकासाठी मला काही लेखक हवे होते. म्हणून प्रकाशन वार्षिकात नावे चाळताना मला अचानक डॉ. विश्वास मेहंदळे यांचे नाव दिसले. त्यांचा पुण्याचा पत्ता आणि फोन नंबर देखील होता. एका परिसंवादातील सहभागासाठी मी त्यांना फोन केला. माझे नाव सांगताच त्यांना लगेच दूरदर्शनचे ते दिवस आठवले आणि त्यांनी त्या आठवणी जाग्या केल्या. मला त्यांनी त्या परिसंमादात लेख देण्याचे मान्य केले आणि ठरल्याप्रमाणे लेख पाठवलाही. ही घटना २००५ ची होती. त्यानंतर २००६ च्या दिवाळी अंकासाठी देखील मी त्यांचा सहभाग मागितला. त्यांनी उत्साहाने मला सहकार्य केले होते.
२००५ पासूनच नव्याने आमच्या स्नेहपर्वाला सुरुवात झाली. तेव्हापासून आमचा नियमित फोनवर संपर्क सुरू राहिला. कधीतरी एकदा फोनवर बोलताना ते विविध व्याख्यानांसाठी जात असल्याचे म्हणाले. २००७ मध्ये नागपुरात मी राहत असलेल्या लक्ष्मी नगरच्या सायंटिफिक को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आयोजित एका व्याख्यानमालेत कोणीतरी नवा वक्ता हवा असे तिथल्या सचिवांनी मला सुचवले होते. मी लगेच मेहेंदळे सरांचे नाव सुचवले. त्यांना फोन करताच ते लगेच कार्यक्रमाला यायला तयार झाले. त्यालाच जोडून आम्ही आमचा एक मित्र स्वर्गीय अनिल मोहरील याच्या स्मृती प्रित्यर्थ एक वक्ता शिबिर आयोजित केले होते. त्याच्या समारोपाला प्रमुख अतिथी म्हणूनही मेहंदळ्यांनाच आम्ही निमंत्रित केले. ठरल्याप्रमाणे मेहेंदळे सर नागपुरात आले. त्यांच्या निवासाची व्यवस्था आम्ही आमदार निवासात केली होती. आधी अनिल मोहरील स्मृती शिबिरात ते प्रमुख अतिथी म्हणून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात देहबोली ते उपग्रहबोली या विषयावर दणदणीत भाषण दिले. एक वेगळे भाषण ऐकून नागपूरकर श्रोते तृप्त होऊन मला धन्यवाद देत होते.
या व्याख्यानाच्या आदल्या दिवशी रात्री मेहंदळे सर माझ्या घरी जेवायला होते. मुंबई दूरदर्शनचे नितीन केळकर, मेहेंदळे सर, निवृत्त विंग कमांडर अशोक मोटे, माझी पत्रकार सहकारी संध्या राजूरकर अशी सगळ्यांची गप्पांची मैफिल त्या रात्री रंगली होती. याच दौऱ्यात मेहेंदळे सर एका दिवाळी अंकासाठी लेख द्यायचा म्हणून महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे घर बघायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अशोक मोटे आणि मी देखील गेलो होतो. दिवसभर त्यांच्यासोबत वेगवेगळे किस्से ऐकण्यात वेळ छान गेला होता.
निघायच्या दिवशी मेहेंदळे सरांना रेल्वे स्टेशनवर सोडायचे म्हणून त्यांना घ्यायला मी आणि अशोक मोटे गेलो, तेव्हा आधी मला थोडा वेळ तुझ्या घरी चहा घ्यायला यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. म्हणून मग आम्ही सर्व माझ्या घरी पोहोचलो. घरी आल्यावर चहा घेता घेता त्यांनी सांगितले की मी ज्या गावात कार्यक्रमासाठी जातो, तिथे ज्या काही भेटवस्तू मला मिळतात त्या ज्यांच्या मदतीने मी कार्यक्रमाला येतो त्यांच्याकडे सोडून जात असतो. त्यामुळे या भेटत असतो भेटवस्तू मी तुझ्या मुलीच्या हातात देऊन जाणार आहे, असे म्हणत त्यांनी मला माझी मुलगी दिव्येशा हिला बोलावून तिच्या हातात एक पिशवी ठेवली आणि सोबत हजार रुपयाची एक नोट दिली. ही तुला खाऊ साठी, असेही त्यांनी सांगितले. त्या पिशवीत व्याख्यानात मिळालेले शाल श्रीफळ आणि एक श्री गणेशाची मूर्ती असे ठेवलेले होते. ते सर्व दिव्येशाच्या हातात सोपवले. लहानगी दिव्येशा थँक्यू म्हणून बाजूला झाली तेव्हा नुसता थँक्यू म्हणू नकोस, माझ्या पाया पड, मी तुझ्या बाबांपेक्षाही मोठा आहे, असे प्रेमळ हक्काने त्यांनी ठणकवलेही. या भेटीनंतर वर्षभरानेच मला सहकुटुंब पुण्याला जाण्याचा योग आला. त्यावेळी मेहेंदळेंच्या घरी जायचे मी ठरवले होते. तिथे जवळच माझे आणखी एक स्नेही रमेश सहस्त्रबुद्धे हे देखील राहायचे. आधी सहस्रबुद्ध्यांकडे गेलो. तिथे थोडा वेळ थांबून मग आम्ही सर्व मेहेंदळेंच्या घरी गेलो. तिथे तब्बल दीड तास आमच्या गप्पा रंगल्या, आणि चहापान करून आम्ही परत निघालो.
याच दरम्यान पुण्याच्या दैनिक केसरीने लोकमान्य टिळकांवर मला एखादा लेख द्यावा अशी मागणी केली होती. एक पत्रकार या नात्याने ठराविक चाकोरीतील लेख नको असेही संपादकांनी मला सांगितले होते. मला लगेच मेहेंदळ्यांचे नाव आठवले. त्यांनी टिळकांच्या विविध पैलूंवर अभ्यास करून काही पुस्तकेही लिहिली होती हे मला माहीत होते. त्यामुळे मी लगेच त्यांना फोन केला. त्या काळात शेतकरी आत्महत्यांचा विषय चांगलाच गाजत होता.लगेचच मेहंदळ्यांनी मला टिळकांनी शेतकरी या विषयावर लिहिलेल्या अग्रलेखांबाबत मी लेख लिहावा असे सुचवले त्या संदर्भात त्यांनी. त्यांनीच लिहिलेले अग्रलेखकार टिळक हे पुस्तकही वाचायला सुचवले. ते पुस्तक नागपुरात मला मिळाले नाही. तेव्हा मी त्यांना तसे कळवले.त्यावेळी मी मुंबईत जाणार होतो. त्यांनी लगेच मुंबईत तू कुठे उतरणार आहेस ते कळव, मुंबईत माझी मुलगी असते, तिच्याकडे या पुस्तकाची प्रत असेलच, तुला मिळण्याची व्यवस्था होईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले. मी मुंबईत ज्या हॉटेलवर उतरलो होतो तिथून त्यांच्या मुलीला फोन केला. तेव्हा हॉटेलमध्ये ते पुस्तक दुसऱ्याच दिवशी हॉटेलच्या काउंटरवर पोहोचलेले होते. एखाद्या नवख्या पत्रकाराला लिहिण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांची किती तळमळ होती हे यावरूनच लक्षात येते.
२००९ नंतर दरवर्षी मी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एका मान्यवराचे व्याख्यान आयोजित करीत असे. २०१० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाजलेल्या जहाजातील उडीला तीन पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. मेहंदळे सरांचे स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रतिमा आणि वास्तव, या विषयावरील पुस्तक प्रकाशित झालेले मला माहीत होते. त्यामुळे त्यांचेच व्याख्यान ठेवावे असा मी विचार केला. लगेच मेहेंदळेंना फोन केला. त्यांनी तत्काळ त्या कार्यक्रमासाठी येण्याचे मान्य केले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी कोणत्या गाडीने कसा येणार याचा सर्व कार्यक्रम कळवला.आम्ही देखील कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाडीने मेहंदळे सर सपत्नीक येणार होते. अचानक संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मला मोबाईलवर फोन आला. त्यावेळी मी नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात होतो. मोबाईलवर मेहंदळे सर बोलत होते. अविनाश माझी गाडी आज संध्याकाळी निघून उद्या सकाळी साडेनऊपर्यंत नागपुरात पोहोचणार होती. मात्र इथे स्टेशनवर आल्यावर कळले की ही ट्रेन जवळजवळ सहा तास लेट आहे. त्यामुळे नागपूरला पोहोचायला संध्याकाळचे साडेचार वाजतील. आपला कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आहे. साडेचारला पोहोचून मी सहा वाजता भाषणाला उभा राहू शकतो. मात्र थोडा उशीर झाला तर तू सांभाळून घे. त्यांची या वयातही धावपळ करण्याची तयारी होती. मात्र मला त्यात रिस्क वाटत होती. म्हणून मी त्यांना थोडा वेळ मागितला. मी लगेच जवळच असलेल्या प्रसन्नच्या बुकिंग काउंटरवर गेलो. तिथे विचारले असता संध्याकाळी साडेसात वाजता पुण्याहून सुटणाऱ्या बसमध्ये दोन जागा रिक्त असल्याचे सांगितले. प्रसन्नचे पुण्यात गाडी सुटण्याचे वाघोली स्थानक रेल्वे स्टेशन पासून बरेच दूर आहे. मी लगेच मेहंदळेंना फोन करून तुम्ही पोहोचू शकाल का असे विचारले. त्यांनी होकार देताच तुम्ही लगेच प्रसन्न कडे रवाना व्हा मी तिकिटाचे डिटेल्स तुम्हाला एसएमएस करून पाठवतो. तिकिटाचे पैसे मी इथेच जमा केले आहेत. तुम्ही गाडीत जाऊन बसा आणि उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाला बोले पेट्रोल पंप स्टॉप वर रिसीव्ह करायला मी येतोच आहे. ठरल्यानुसार मेहंदळे पती-पत्नी नागपुरात येऊन पोहोचले. आम्ही त्यांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवासात केली होती. तिथे दुपारभर विश्रांती घेऊन ते संध्याकाळी पावणेसहाला कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले. त्यांनी तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर- प्रतिमा आणि वास्तव या विषयावर दणदणीत व्याख्यान दिले. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच त्यांनी काल ट्रेनचा झालेला गोंधळ आणि तो कळवताच अविनाशने प्रसंगावधान राखून तत्काळ केलेले नियोजन याचा आवर्जून उल्लेख केला होता.त्यानंतर जेव्हा जेव्हा मेहेंदळे सर नागपूरला यायचे तेव्हा तेव्हा त्यांचा आवर्जून फोन घ्यायचा. मग आमची भेट व्हायची आणि गप्पा देखील होत असत. मी पुण्याला गेलो की मी देखील त्यांना भेटत असे. त्यांची माझी शेवटची भेट २०१८ मध्ये ते नागपूरला आले असताना झाली होती. नंतर कोरोनाच आला. त्यामुळे प्रवास बंदच होते. त्या काळात अनेक फारसा फोनवरही संपर्क नव्हता. कधीतरी कोणाकडून माहिती मिळाली की सरांची तब्येत ठीक नाही. मात्र फोनवर संपर्क होऊ शकला नाही, आणि अचानक एक दिवस सोशल मीडियावर बातमी वाचली की डॉ. विश्वास मेहंदळे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले आहे. मी लगेच आमचे कॉमन स्नेही देवेंद्र भुजबळ यांना फोन केला. त्यांनी बातमी खरी असल्याचे सांगितले. मुलुंडला मुलीकडे असतानाच ते आजारी झाले होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉक्टर मेहेंदळे एक माध्यमतज्ञ होते, एक लेखक होते, तर एक अभिनेते आणि दिग्दर्शक देखील होते. मला आठवते त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक देखील लढवली होती. त्यावेळी नागपूर विभागात त्यांचा प्रचार देखील मी केला होता. मात्र त्यात ते विजयी झाले नाहीत. या दरम्यान पुण्यात त्यांनी आयोजित केलेल्या एका पत्र परिषदेत मी त्यांच्यासोबत सहभागी देखील झालो होतो.नंतर पुण्यातच एका संस्थेतर्फे आणखी एक नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात जब्बार पटेल, रोहिणी हट्टंगडी आणि इतर मान्यवर अभिनेते अभिनेत्री सहभागी झाले होते. त्यात योगायोगाने मलाही उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती.
तसा विचार करता मी एक सामान्य माणूस, मात्र पत्रकारितेत राहिल्यामुळे डॉ. मेहेंदळे यांच्यासारख्या मान्यवरांशी माझा संपर्क आला, आणि आयुष्यात दीर्घकाळ आमचे स्नेहसंबद्ध राहिले. माझ्या दृष्टीने तो एक भाग्ययोगच म्हणावा लागेल.