माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्रातील पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा सहाजिकच मनोहर गजानन जोशी हे नाव समोर येते. मनोहर जोशी हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नव्हते, तर काही काळ मुंबईचे महापौर, काही काळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, काही काळ केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, आणि काही काळ लोकसभा अध्यक्ष या पदावर देखील राहिले. त्यांचे एकच वैशिष्ट्य होते की या काळात ते असंख्य माणसं जोडत गेले. तिथे त्यांनी त्या माणसाची श्रीमंती, प्रतिष्ठा याचा कधीही विचार केला नाही. जिथे सूर जुळले तिथे त्यांनी मैत्री केली आणि ती निभावली देखील.
सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर जोशींच्या असंख्य स्नेही जनांपैकी मी देखील एक होतो. एक पत्रकार म्हणून त्यांचा माझा संपर्क आला आणि त्याचे रूपांतर स्नेहसंबंधात झाले. अखेरपर्यंत त्यांनी ते निभावले देखील.
मी पत्रकारितेत असल्यामुळे शिवसेना नेते प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, आणि मनोहर जोशी या तीन नावांशी परिचित होतोच. कधीमधी त्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांकन करायला देखील जावे लागायचे. मात्र थेट संपर्क यायला आधी ते मुख्यमंत्री व्हावे लागले.
१९९५ मध्ये जोशी सर महाराष्ट्राचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. त्यांची कारकीर्द देखील लक्षणीय राहीली. मला आठवते १९९६ च्या नागपूर अधिवेशनापासून मला विधिमंडळात दै.पुढारीचा विदर्भ प्रतिनिधी या नात्याने वृत्त संकलन करायला जावे लागले. त्यावेळी विधिमंडळातील पत्रकारांशी त्यांचा जास्त संपर्क यायचा. १९९६ मध्येच त्यांनी अधिवेशन काळात जेव्हा सर्व विधिमंडळाचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना स्नेहभोजनाला बोलावले होते. तेव्हा त्यांचा माझा सर्वप्रथम परिचय झाला. त्यानंतर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्र परिषदेत मी त्यांना जे काही प्रश्न विचारले, ते त्यांच्या चांगलेच लक्षात राहिले, आणि तिथून हळूहळू आमचा संपर्क वाढायला सुरुवात झाली. १९९७ मध्ये नागपुरातील विधिमंडळाचे अधिवेशन फक्त आठच दिवसाचे झाले होते. कारण त्यावेळी लगेचच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार होत्या. त्यादरम्यान झालेल्या स्नेहभोजनात काही पत्रकारांनी आता या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनवणार का असा प्रश्न विचारला असता जोशी सरांनी "दिल्ली की जीत अटल है" असे सूचक उत्तर दिले होते. त्यांच्या या उत्तराची लगेचच बातमी बनवून पुढारीला पाठवली होती. दुसऱ्याच दिवशी ती बातमी पहिल्या पानावर छापून आले हे बघून जोशी सरांनी ही बातमी कोणी दिली असा प्रश्न पुढारीचे आणखी एक पत्रकार उदय तानपाठक यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले. लगेचच सरांनी "छान बातमी दिली अविनाशजी तुम्ही" म्हणून माझे कौतुकही केले.
१९९९ मध्ये देशात पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी शिवसेनेने जोशी सरांना दादर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली होती. त्यात जोशी सर विजयी झाले आणि लगेचच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. अवजड उद्योग मंत्री झाल्यानंतर सरांचे निकटवर्ती खासदार सुबोध मोहिते यांनी सुरू केलेल्या डायबा टी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी सर नागपुरात आले होते. तेव्हा भेटल्यावर त्यांनी आवर्जून चौकशी केली होती.
याच काळात विदर्भातील रामटेक लोकसभा क्षेत्रातून माझे एक स्नेही सुबोध मोहिते यांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. ते निवडून देखील आले होते. सुबोधजींच्याच आग्रहामुळे मी रामटेकच्या गडावरून नावाचे एक साप्ताहिक सुरू केले. त्या दरम्यान जोशी सर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. २००२ च्या रामटेकच्या गडावरून च्या दिवाळी अंकात मनोहर जोशींची "नांदवी ते लोकसभा अध्यक्षांचा बंगला" या शीर्षकाची एक मुलाखत प्रकाशित केली होती. माझे मुंबईतील पत्रकार मित्र नारायण हरळीकर यांनीच ती मुलाखत घेतली होती. ती मुलाखत खूप गाजली आणि आमचा दिवाळी अंक देखील चांगलाच गाजला. त्यानंतर ऑगस्ट २००३ मध्ये मनोहर जोशी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. तेव्हा त्यांना हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये मी भेटायला गेलो. त्यावेळी तिथे नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले सुबोध मोहिते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते नितीन गडकरी हे देखील होते. सरांना मी दिवाळी अंक दाखवला. तसा त्यांनी तो आधी बघितला होताच. मात्र मी तो दिवाळी अंक संपादित केला आहे हे कळल्यावर त्यांनी माझे विशेष अभिनंदन केले होते. "हे साप्ताहिक नेटाने चालवा" असे सांगताना "आमचे रामटेकचे खासदार तुम्हाला मदत करतात की नाही? करत नसले तर मला सांगा. मी आत्ताच त्यांना रागावतो" अशी मिश्किल टिपणी देखील त्यांनी त्यावेळी केली.
२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरांना दादर मधून पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही त्यांचा जनसंपर्क आणि समाजसेवा सुरूच होती. त्याच काळात मी रामटेक च्या गडावरून चा एक "बाळासाहेब ठाकरे विशेषांक" प्रकाशित केला होता. त्यात जोशी सरांचाही लेख होता. ज्यावेळी अंकाचे प्रकाशन मुंबईत बाळासाहेबांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांच्याच हस्ते झाले, त्यावेळी मनोहर जोशींनी आवर्जून "बाळासाहेब यात माझा देखील लेख आहे बरे. अविनाशजींनी आवर्जून मागून घेतलेला आहे" असेही सांगितले होते.
लगेचच थोड्याच दिवसात मी राज ठाकरे विशेषांक प्रकाशित केला. त्यामागे राज ठाकरे यांचे निकटचे सहकारी नागपूरचे हेमंत गडकरी यांचे विशेष सहकार्य लाभले होते. हेमंत गडकरींनी या विशेषांकाचे प्रकाशन मनोहर जोशींच्या हस्ते करायचे ठरवले. त्यानुसार दादरच्या जोशी सरांच्या कार्यालयातच बाहेरच्या सभागृहात तो कार्यक्रम झाला. त्या विशेषांकाला मी "हुंकार मराठी मनाचा" असे शीर्षक दिले होते. जोशी सरांनी आपल्या भाषणात "अविनाशजी हा हुंकार नसून मराठी मनाचा ओंकार आहे" अशी टिपणी केली होती. त्यात मी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ताप्रमाणेच मध्ये बाळासाहेब एका बाजूला उद्धव आणि एका बाजूला राज असे रेखाचित्र टाकले होते. आणि खाली यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे असे शीर्षक दिले होते. ते शीर्षक देखील सरांना फार आवडले. "असे कल्पक रेखाचित्र या अंकात दिल्याबद्दल संपादकांचे विशेष कौतुक" असे सांगत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हे रेखाचित्र प्रेम करून लावले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
रामटेक च्या गडावरून चा जो दिवाळी अंक मी दरवर्षी प्रकाशित करत असे. त्याला विदर्भा बाहेरची कोणीतरी मान्यवर व्यक्ती अतिथी संपादक म्हणून मी निमंत्रित करत असे. २००६ चा दिवाळी अंक काढायचे ठरवले, तेव्हा एप्रिल २००६ मध्ये मुंबई भेटीत मी जोशी सरांच्या दादरच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला गेलो. भेटल्यावर त्यांच्या हातात विनंती पत्र दिले आणि तुम्ही अतिथी संपादक व्हावे अशी विनंती केली. "त्यासाठी मला आता काय करावे लागणार?" असा त्यांनी मला प्रश्न केला. तेव्हा 'फारसे काहीच करायचे नाही फक्त अतिथी संपादकीय आणि तुमचा एखादा लेख मला अपेक्षित राहील आणि संपूर्ण काळात अतिथी संपादक म्हणून तुमचे नाव वापरण्याची" परवानगी मिळावी इतकीच अपेक्षा असल्याचे मी त्यांना स्पष्ट केले. त्यांनी लगेचच होकार दिला. त्या पत्रावर त्यांनी काहीतरी मार्ग देखील लिहिला आणि गंमत अशी की मी मुंबईहून परत आलो तो दुसऱ्याच दिवशी सरांचे अतिथी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचे पत्र देखील माझ्या निवासस्थानी येऊन पोहोचले होते.
दिवाळी अंकाच्या काळात सरांशी सतत संपर्क येत होता. एव्हाना सर राज्यसभा सदस्यही झाले होते. मात्र ते कितीही व्यस्त असले तरी मुंबईत गेल्यावर ते लगेच भेट द्यायचे, आणि माझ्याशी चर्चा देखील करायचे. दिवाळी अंक प्रकाशित होण्यापूर्वी साधारणपणे दोन महिने आधी मी मुंबईत गेलो असता सरांना भेटलो. "तेव्हा तू कसा काय आलास?" अशी त्यांनी चौकशी केली. जाहिरातींच्या धुळवाजुळवे साठी आलो असे उत्तर मी दिले. लगेचच तुला जाहिरातींसाठी काही पत्र हवी असतील तर मला सांग मी लगेच देतो असे त्यांनी मला आश्वस्त केले. मी लगेच त्यांच्याकडे काही पत्र पाठवले. त्यांनी लगेच संबंधितांना आपले कव्हरिंग लेटर जोडून या उपक्रमाला मदत करावी अशी विनंतीही केली. त्यामुळे मला काही जास्तीच्या जाहिराती देखील मिळाल्या होत्या.
याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातील एका विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि जोशी सर नागपूरात आले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम हॉटेल प्राइडवर होता. सकाळी लवकरच मी त्यांना प्राईडवर भेटायला गेलो. थोडा वेळ आमचे दिवाळी अंकासोबत बोलणे झाल्यावर सर बाजूच्याच रुममध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंकडे मला भेटायला घेऊन गेले. उद्धवजींची आधीचीच माझी ओळख असल्यामुळे त्यांच्याशी थोडा वेळ बोलणे झाले.
तितक्यात गोपीनाथजी मुंडे तिथे आले. काही वेळ गोपीनाथजी आणि जोशी सर यांची एकमेकांचे फिरकी घेणे झाले, आणि गोपीनाथजींसोबत मी देखील निघालो.
दिवाळी अंकाचे काम अगदी अंतिम टप्प्यात आले असतानाच त्यावर्षी माझ्या मातोश्रींची तब्येत अचानक बिघडली आणि त्यात आईचे निधन झाले. परिणामी दिवाळी अंक प्रकाशित होण्यास उशीर होणार होता. सरांना तसा मी लगेच फॅक्स केला. त्यांचा लगेचच मला फोन आला आणि त्यांनी शोक संवेदना व्यक्त करत अंक उशिरा निघाला तरी काळजी करू नकोस, असे सांगितले. त्यावर्षी अंक जवळजवळ एक महिना उशिरा प्रकाशित झाला. तरीही त्या अंकाने त्यावर्षी चार प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले होते. सरांना हे कळतच त्यांचा अभिनंदनचा फोन आला. त्यातील रामशेठ ठाकूर प्रतिष्ठानचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अलिबागला जायचे असताना मी त्यांना फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो. तेव्हा मी लगेच पोहोचल्यावर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देत माझे अभिनंदनही केले होते.
नंतर २००८ च्या दिवाळी अंकासाठी जाहिराती मिळाव्यात म्हणून सरांची काही पत्र घेण्यासाठी मी त्यांना दिल्लीत भेटलो होतो. तेव्हाही सरांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्या दिवशी त्यांच्या कार्यालयात बसलो असताना आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. तेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र कधी येतील तो सुदिन, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती.
२०१२ मध्ये सरांची राज्यसभेची टर्म संपली. त्यावेळी बाळासाहेबांची तब्येत बरीच खालावली होती. नंतर नोव्हेंबर २०१२ मध्येच बाळासाहेबांनी यहलोकीची यात्रा संपवली. शिवसेनेत उद्धव राज्य सुरू झाले. तिथून जोशी सरांशी शिवसेनेतले महत्त्व हळूहळू कमी झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी दादरचे आपले संपर्क कार्यालय देखील बंद केले होते, आणि ते दादर स्टेशन जवळ असलेल्या कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयातच बसत होते. या काळात माझ्या देखील भेटी कमी झाल्या होत्या. मात्र दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना फोन करायचो आणि विशेष म्हणजे माझ्या वाढदिवसाला देखील त्यांचे पत्र येत असे. मात्र या काळात ते राजकारणातून आणि समाज जीवनातून हळूहळू निवृत्त होऊ लागले होते.
२०१९ मध्ये नागपूरच्या सन्मित्र सभेला सरांचे व्याख्यान ठेवायचे होते. सभेचे त्यावेळचे एक पदाधिकारी डॉ. संजय घटाटे माझ्याकडे आले आणि तुमचा आणि सरांचा चांगला परिचय आहे तेव्हा तुम्ही आम्हाला सरांची तारीख जमवून द्या अशी विनंती केली. त्यानुसार मी सरांना फोन केला त्यांनी व्याख्यानासाठी येण्याची तयारी दर्शवली, आणि लगेच तारीख देखील दिली. आयोजकांनी व्याख्यानासाठी चार-पाच विषय सुचवले होते. त्यातील "अवघे पाऊणशे वयमान" या विषयावर बोलण्याचे सरांनी मान्य केले.
ठरल्यानुसार सकाळी मुंबईहून येणाऱ्या विमानाने सर नागपुरात आले. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद पटवर्धन हे देखील होते. मी समोर दिसताच ""काय म्हणता अविनाशजी, खूप वर्षांनी आपण भेटतो आहोत" म्हणून त्यांनी प्रेमाने हात मिळवला. मग त्यांना घेऊन मी अशोका हॉटेल मध्ये गेलो आणि तिथेच त्यांचा मुक्काम होता. दुपारी त्यांच्यासोबत एका ठिकाणी स्नेहभोजनासाठी देखील आम्ही एकत्र गेलो होतो.
संध्याकाळी साडेसहा चा व्याख्यानाचा कार्यक्रम होता. त्याआधी दुपारी साडेचार वाजताच सरांना भेटण्यासाठी हॉटेल अशोका मध्ये गेलो. माझ्यासोबत माझी पत्नी सौ अनुरूपा आणि नागपूरच्या प्रसिद्ध संगीतकार डॉ .तनुजा नाफडे या देखील होत्या. तनुजा नाफडे यांनी त्याच वर्षी भारतीय लष्करासाठी भारतीय सुरवातीची मार्शल ट्यून कंपोज केली होती. त्यावर्षी ही मार्शल ट्यून दिल्लीत होणाऱ्या गणतंत्र दिन परेडमध्ये वाजवली देखील गेली होती. त्यांचा परिचय करून दिल्यावर सरांच्या आणि आम्हा तिघांच्याही चांगल्या गप्पा झाल्या. संध्याकाळी सहा वाजता सर कार्यक्रमाला जायला तयार झाले. खाली त्यांना नेण्यासाठी गाडी आलीच होती. रूम मधून तयार होऊन सर खाली आले आणि कार मध्ये बसू लागले. तितक्यात त्यांनी मला विचारले "अविनाश ची तुम्ही कार्यक्रमाला येत आहात ना, मग चला गाडीतच," मी त्यांना सांगितले 'सर मी माझ्या स्कूटर वर येतो" सर लगेच म्हणाले "मग चला मी ही तुमच्या स्कूटरवर येतो" मी सरांना म्हटले "माझी गंमत करता का? माजी लोकसभा अध्यक्षांना मी स्कूटरवर डबल सीट घेऊ, ती बातमी होईल" त्यावर सर उद्गारले "अविनाशजी मी सुद्धा एका काळात मुंबईत स्कूटर चालवलेली आहे. आजही मला स्कूटर वर बसायला आवडते. त्यामुळे आज मी तुमच्या स्कूटर वर चालतो." त्यावेळी मी सांगितले "सर माझ्याबरोबर माझी पत्नी आहे". हे , ऐकताच सर लगेच म्हणाले "नाही मग तुमच्या स्कूटरवर तुमच्यासोबत बसण्याचा पहिला हक्क त्यांचाच आहे. मी तो हक्क डावलणार नाही." असे म्हणत हसत हसतच सर कार मध्ये बसले आणि आम्ही कार्यक्रम स्थळे निघालो.
त्या दिवशी सरांचे व्याख्यान अगदी दणदणीत झाले. रात्री कार्यक्रम संपल्यावर त्यांना विमानतळावर देखील सोडायला मी गेलो होतो. त्यावेळी सर म्हणाले "अविनाशजी आता मुंबईला आलात की भेटूया."
दुर्दैवाने ती आमची अखेरचीच भेट ठरली. त्यानंतर मी एक दोनदाच मुंबईला गेलो ते खूप घाईत. त्यामुळे सरांची भेट झाली नाही. नंतर कोरोनाच आला, त्यामुळे बाहेर जाणे बंद होते. दरम्यानच्या काळात मुंबईच्या पत्रकार मित्रांकडून कळले की सरांची तब्येत आजकाल ठीक राहत नाही. तरीही त्यांच्या वाढदिवसाला मी फोन करतच होतो. शेवटचा फोन मी डिसेंबर २०२३ मध्ये केला होता. नंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये एक दिवस सकाळी सर गेल्याचीच बातमी आली.
मनोहर जोशी हे गरिबीतून वर आलेले व्यक्तिमत्व होते. एका काळात ते आपल्या गावी मधुकरी मागून शिकले होते. नंतर मुंबईतही कष्ट करून आपले साम्राज्य उभे केले. हे उभे करताना त्यांनी असंख्य मित्र जोडले हो.ते मी देखील त्यांच्यातलाच एक होतो. इतक्या मोठ्या माणसाशी माझे संबंध आले आणि त्यांनीही ते जपले याचा मला आजही आनंदच आहे.