अथक संघर्षमयी जिद्दीचा जीवन प्रवास
वासुदेव सुरजूसे एक प्रचंड जिद्दी कष्टाळू आणि तितकच निर्भीड व्यक्तिमत्व.
कधीही नशीबाला दोष न देता आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा हसतमुखाने सामना करत त्यातून मार्ग काढत त्यांनी कष्टकरी मच्छिमार समुदायाला आर्थिक स्वावलंबनाचा मूलमंत्र दिला, आमूलाग्र क्रांती घडविली. सर्वात महत्वाच म्हणजे आपल व्यक्तिगत व्यावसायिक आयुष्य आणि मच्छिमारांचा लढा नळ दमयंती सागर मच्छिमार सहकारी संस्था यांची सरमिसळ केली नाही. त्यांनी मच्छिमार समूहासाठी दिलेल्या लढ्याच स्वरूप बहुआयामी होत. ज्या भोई समाजात ते जन्माला आले त्या समाजबांधवांवर होणाऱ्या अन्यायाने पेटून उठून त्यांनी खाजगी ठेकेदारी विरुध्द क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्यांनी केलेला हा संघर्ष जितका जमिनीवरचा - रस्त्यावर उतरून केलेला होता तितकाच तो न्यायिकही होता. कायदेशीर लढा देतांना त्यांनी आपल उपजत व्यावहारिक कौशल्यपणाला लावल. अनुभवाची समृध्द शिदोरी, समाजाविषयी असलेली कळकळ, अन्यायविरुध्द बंड करण्याचा जात्या स्वभाव यांनी त्या लढ्याला व्यापक रूप दिल. या लढ्याने गोड्यापाण्यात मच्छिमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न तर सुटलाच आणि एकूणच गोड्या पाण्यातील मत्स्यविषयक धोरणातील बदलासाठी, गोड्या पाण्यातील मासेमारी संदर्भात नवीन शासकीय धोरण विकसित करण्यासाठी या लढ्याने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.
एखादा साहसी चित्रपट पहावा वासुदेवरावांच आयुष्य चित्तथरारक तितकच प्रेरणादायी आहे. आयुष्यातील बहुतांश घटना क्षणाक्षणाला थरार वाढविणाऱ्या आहेत. त्यांनी प्रसंगी हिंसक आंदोलनाचा पवित्रा घेऊन अंतस्थ सतत अहिंसात्मक मार्गाने लढा दिला. जनआंदोलनाला नवीन परिमाण दिला. आपल्या समाजामध्ये मुळात त्यांच्याविरुध्द खासगी ठेकेदारीमुळे होणाऱ्या अन्यायाबद्दलची अंगार जागृत करून त्यांनी क्रांतीचा झंझावात निर्माण केला. या एल्गाराने मच्छिमार समुदायात क्रांतीच नवचैतन्य निर्माण झाले त्यांच बालपण अत्यंत रोमांचक गेल. बालपणातच त्यांच्यात दडलेल्या व्यावसायिकाची चाहूल दिसू लागली लहानपणापासून नवनवीन उद्योगधंदे करण्याची अवीट उर्मी होती. त्याच पर्यावसन पुढे ते यशस्वी व्यावसायिक होण्यात झाले. त्यांनी बालपणी अपार कष्ट केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. ते क्रांतिकारी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या धमन्यांतही क्रांतिकारी रक्त सळसळत होते. त्यात दूरदृष्टी आणि समयसूचकता हे आणखीन एक वेगळेपण त्यांच्यात होत.
त्यांच्यातील आणखीन एक महत्वाचा गुण म्हणजे हिशेब आणि सचोटीने केलेला व्यवहार. आजही कायद्यातील अनेक कलम त्यांची तोंडपाठ आहेत. वासुदेवरावांनी लढलेला न्यायिक लढा अत्यंत अभ्यासपूर्ण होता. त्यांच फक्त प्राथमिक शिक्षण जरी झालेल असल तरी त्यांची कुठल्याही समस्यांकडे बघण्याची दृष्टी अभ्यासू आहे. त्यांच्या स्वभावातच कमालीचा दयाळूपणा आणि मन मात्र धोरणी आहे. समाजाबद्दलची आंतरिक कणव आहे. मच्छिमारांना न्याय मिळायला हवा, त्यांना सन्माननीय उपजिविका मिळावी यासाठी त्यांची अविरत धडपड चालू असते. त्यांनी खाजगी ठेकेदारांच्या मुजोर वर्चस्वाला घाव घालत सहकार पध्दतीने तलावांची ठेकेदारी मिळावी यासाठी जीवाच रान केल. मत्स्य सत्याग्रह असो, बेमुदत उपोषण केली, चक्का जाम आंदोलन असो किंवा थेट तलावात उतरून घातलेला घेराव असो. त्यांच्यासाठी अप्परवर्धा धरणाची ठेकेदारी हा विषय मच्छिमारांच्या न्याय हक्कांच्या लढयाचा आहे.
नळ दमयंती सागर मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने त्यांच्या व्यासंगी नेतृत्वाखाली मच्छिमार समुदायाच्या व्यावसायिक हक्कास व्यक्तीगत आणि सामुहिक संघर्ष तसेच मच्छिमारांच्या सक्षमीकरणाकरिता व्यवस्थापकीय कार्यप्रणाली विकसित केली.
वासुदेवराव मुळचे व्यावसायिक असल्याने कारभार अत्यंत चोख असण्याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. सहकाराच्या माध्यमातून गरीबातील गरीब मच्छिमाराला न्याय मिळू शकतो, त्याला सन्माननीय जीवन जगता येऊ शकत अशी त्यांची धारणा आहे. आज म्हणूनच फारस शिक्षण नसतांनाही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची नागपूर येथील मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संचालक सदस्य पदावर वर्णी लागली आहे. त्यांचा सतत नळ दमयंती सागर मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. मत्स्य बीजोत्पादन केंद्र असो, इलाहबाद वरून कारागीर बोलवून नौका तयार करण्याची शेड असो या स्वावलंबनाचीच प्रचिती देतात. आज त्यांच्या संस्थेत बनविलेल्या नौका राज्यातील विविध भागात पाठविल्या जात आहेत. त्यांनी नळ दमयंती सागर मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने मच्छिमारांची फक्त आर्थिक उन्नती केली नाही तर त्यांना चांगल माणूस म्हणून जगता याव यासाठी प्रयत्न केले, मच्छिमारांमधील व्यसनाधीनता आणि अंधश्रध्दा निर्मूलनावर काम केल. त्यांचा आधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास असल्याने संस्थेचा कारभार ऑनलाईन पध्दतीने होतो ते स्वतः संस्थेच्या प्रत्येक कामकाजावर जातीने देखरेख ठेवतात. त्यांनी ठेवलेले चोख व्यवस्थापन, व्यवस्थापकीय यंत्रणा कार्यप्रणाली एखादया कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल असे आहे. ते स्वतः मत्स्य व्यवसाय - जलाशय ठेका वाटप धोरणासंदर्भातील वस्तुस्थिती पडताळणी समितीचे सदस्य असल्याने त्यांची संस्थेच्या व्यवस्थापनाकडे करडी नजर असते. संस्थेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक, पत्रकार, शासकीय विभागातील उच्चपदस्थ, सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी संस्थेला आवर्जून अभ्यासभेटी देत आहेत. संस्थेने वासुदेवरावांच्या नेतृत्वाखाली मत्स्य उत्पादन वाढीकरिता अनेक यशस्वी प्रयोग केले मत्स्यवाढ आणि मच्छिमारांच्या शाश्वत उपजिविकेसाठी, त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने ठोस यंत्रणा विकसित केली. या प्रक्रियेमुळे मच्छिमारांचे जीवनमान सुधारले, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढीकरिता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन तंत्राचा मुक्त स्वीकार केला.
संस्थेने मच्छिमार समुदायाला सक्षम करण्यासाठी मच्छिमारांना आणि मत्स्योद्योग पूरक धोरण आकारावीत यासाठी वेळोवेळी शासकीय धोरणात सुधारणा मांडल्या या धोरणाच्या अमंलबजावणीकरिता ठोस कार्यप्रणाली विकसित केली. मच्छिमार आणि विशेषत्वाने मच्छिमार महिलेचा विचार करीत महिलापूरक सर्वसमावेशक प्रारूपाचे तयार केले गेले.
आजही त्यांचा लढा संपलेला नाही. आजही वासुदेवराव कुठल्याही राजकीय सामाजिक दबावतंत्राला न जुमानता आपली सहकाराची ध्वजा घेऊन प्रत्येक आव्हांनांना सामोरे जात आहेत. सकारात्मकता, नैतिकता आणि त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती यामुळे ते कुठल्याही दडपशाहीला न जुमानता भविष्याचा वेध घेत मच्छिमारांच्या हितासाठी न्यायिक लढाईही समर्थपणे लढत आहे.
आपण ६५ व्या वर्षी प्रदार्पण करत आहात .आपले जीवन सुखी समृद्धी निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा !
*लेखिका - नंदिनी चव्हाण - मुंबई*
*लेख विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111