बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील
-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!
-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु
इंदापूर : प्रतिनिधी दि.11/6/25
प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांग विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतमजूर, युवक यांच्या हितासाठी केलेल्या विविध मागण्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 11) सायंकाळी दूरध्वनीवरून चर्चा केली व पाठिंबा व्यक्त करीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.
बच्चू कडू यांनी मोझरी-अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ विविध मागण्यासाठी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा बुधवार हा 4 था दिवस आहे.
बच्चू कडू यांचेची दूरध्वनीवरून चर्चा करून हर्षवर्धन पाटील यांनी बच्चू कडू यांच्या विविध मागण्यांवरती राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून त्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे सत्ताधारी पक्षांने निवडणुकीच्या संकल्पपत्रात जाहीर केलेले आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन अनेक महिने होऊनही सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. सध्या शेतकरी अडचणीत असून उत्पादन खर्च वाढला असून शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, ही बच्चू कडू यांची रास्त मागणी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच बच्चू कडू यांनी समाजातील इतर घटकांच्या हितासाठी केलेल्या विविध मागण्याही राज्य सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
___________________________