एरंडोल – काल मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे व अंजनी नदीच्या उगम स्थानावर अतिवृष्टी झाल्याने नदीचा प्रवाह बदलला. त्यामुळे तालुक्यातील जुनी सोनबर्डी गावात पुराचे पाणी शिरले व जवळपास २५ कुटुंबातील ६० ते ७० नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून SDRF च्या पथकाच्या मदतीने सर्वांना जवळच्या आश्रमशाळेत स्थलांतरीत करण्यात आले.
पुरामुळे गावातील शेती व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय एरंडोल शहरातील फकीर मोहल्ला व कुंभारवाडा येथील काही कुटुंबे देखील पुराच्या वेढ्यात अडकली होती, त्यांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री मा. गिरिशभाऊ महाजन, खासदार मा. स्मिताताई वाघ, जिल्हा धिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार अमोल पाटील यांनी प्रभावित भागांची पाहणी केली. नागरिकांना भोजन व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण यंत्रणा सतर्क असून मदतकार्यावर स्थानिक आमदार स्वतः लक्ष ठेवून आहेत.


