एरंडोल | प्रतिनिधी –महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार मार्च २०२५ पासून दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र अद्यापही फरकाची रक्कम अनेक लाभार्थ्यांना मिळालेली नसल्याने त्याचा तात्काळ लाभ द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संस्था (रजि.), महाराष्ट्र राज्य – एरंडोल यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष रमेश वामन चौधरी यांनी तहसीलदार, तहसील कार्यालय एरंडोल यांना लेखी निवेदन दिले आहे. शासन आदेशानुसार दिव्यांगांना ₹२५००/- दरमहा मानधन मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ₹२५०० ऐवजी जुने ₹१५००/- दिले जात असून ₹१०००/- चा फरक मागील काही महिन्यांपासून थकीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर फरकाची रक्कम तात्काळ वितरित करून दिव्यांग बांधवांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
तहसील कार्यालयाने सदर निवेदनाची दखल घेत पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
(वरील सर्व माहिती निवेदनात म्हटल्याप्रमाणे.)



