तीन दिवसांच्या आमरण उपोषणाची दखल; महसूल प्रशासनाला जाब विचारत विजय दादांनी घेतली आक्रमक भूमिका
भोर | प्रतिनिधी
भोर तालुक्यातील एका वडार कुटुंबावर गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोप करत श्री. दीपक छगन धोत्रे व श्री. छगन तुकाराम धोत्रे हे गेल्या तीन दिवसांपासून भोर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. या प्रकरणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वडार एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपोषणस्थळी धाव घेतली.
उपोषणकर्ते दीपक धोत्रे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून विजय दादा गोरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी बोलावून घेत “गरीब वडार कुटुंबाला न्याय देण्याऐवजी एका तक्रारीच्या दबावामुळे त्यांच्यावर अन्याय का केला जात आहे?” असा थेट सवाल केला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार कदम साहेब व जायगुडे मॅडम यांच्याकडे विजय दादा गोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित व्यक्तीविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत, त्याच्या तक्रारी व धमक्यांच्या दबावाखाली प्रशासनाने निर्णय घेऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
“एका तक्रारदाराच्या दबावामुळे गरीब कुटुंबाची उपासमार होत असेल, तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. वडार समाजातील कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका विजय दादा गोरे यांनी घेतली.
तहसीलदार भोर हे कार्यालयात नसून मुंबईला गेल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर विजय दादा गोरे यांनी तहसीलदार भोर तसेच पोलीस निरीक्षक भोर यांना आंदोलनाबाबत लेखी निवेदन दिले. विशेष म्हणजे, प्रश्न सुटेपर्यंत ते भोर येथेच मुक्काम ठोकून राहिले.
अखेर तहसीलदारांसमोर थेट जाब!
दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन कार्यालयात आल्यानंतर विजय दादा गोरे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रश्न उपस्थित केला—
“एका तक्रारदाराच्या दबावामुळे माझ्या वडार समाजातील गरीब कुटुंबाला उपाशी मारणार का?”
यावर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी “नाही अध्यक्ष साहेब, आम्ही सकारात्मक निर्णय करू,” असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रशासनाकडून लेखी पत्र उपोषणकर्त्यांच्या हातात देण्यात आले.
‘समाजासाठी धावणारा नेता’ म्हणून विजय दादांचे कौतुक
या संपूर्ण प्रकरणात विजय दादा गोरे यांनी केवळ आश्वासन देऊन थांबण्याऐवजी उपोषणस्थळी धाव घेणे, संबंधित अधिकाऱ्यांना समोर बोलावणे, प्रशासनाला जाब विचारणे, लेखी निवेदन देणे आणि प्रश्न सुटेपर्यंत भोरमध्ये मुक्काम ठोकणे, या कृतीतून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.
वडार समाजातील एखाद्या कुटुंबावर अन्याय झाला की त्याच्या मदतीला धावून जाणारा, प्रशासनाच्या दारात ठामपणे उभा राहणारा आणि “न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही” अशी भूमिका घेणारा नेता म्हणून विजय दादा गोरे यांची भूमिका या घटनेत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
भोरमधील या प्रकरणामुळे वडार समाजातही विजय दादा गोरे यांच्या भूमिकेचे कौतुक होत असून, “समाजाच्या अडचणीच्या काळात पुढे येणारा नेता असावा तर विजय दादांसारखा,” अशी भावना व्यक्त होत आहे.
000

