आयोडीन न्यूनता विकार ही एक सामाजिक समस्या..!
आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात काही आजाराचे प्रमाण बरेच अंशी वाढलेले आहे. अशाच आजारापैकी गलगंड हा एक आजार आहे. आयोडीनच्या न्यूनतेमुळे मानवाला सर्वसाधारण किंवा अतिशय गंभीर असे शारीरिक व मानसिक आजार होऊ शकतात. सहजासहजी दिसणारा आणि ओळखता येणारा गलगंड हे आयोडीन न्यूनतेचे एक लक्षण आहे. आहारात आयोडीन न्यूनता असणाऱ्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व उपजत मृत्यू होतात. हायपोथॉयरडीझम,मेंदूची वाढ खुंटणे,शारीरिक वाढ खुंटणे,बुद्यांक कमी होणे,मनोबल व बाल जिवित्वात घट असे दुष्परिणाम आयोडिनच्या कमतरतेमुळे होण्याची शक्यता असते.
गर्भवती स्त्रियांमध्ये जर गर्भारपणात आयोडिनची कमतरता असेल तर गर्भाला पण आयोडिनची कमतरता भासते आणि त्याचे दुष्परिणाम थॉयरॉक्झिनच्या निर्मितीवर होतात. थॉयरॉक्झिनची निर्मिती योग्यरित्या न झाल्याने गर्भाची बौद्धिक व शारीरिक वाढ नैसर्गिक रीतीने होत नाही. अशा प्रकारे बुद्धीची खुंटलेली वाढ ही कायम स्वरूपाची व भविष्यात बौद्धिक विकासाला आळा घालणारी ठरू शकते.
सर्वेक्षणात असे सिद्ध झाले की,आयोडिनच्या कमतरतेमुळे सर्व शाळांमधील मुलांचा बुद्यांक हा 10 ते 15 गुणांनी कमी असतो.
आयोडिनच्या न्यूनतेमुळे होणारे विकार :-
जीवनातील टप्पे व त्यावर होणारे परिणाम
गर्भ :- गर्भपात,उपजत मृत्यू,जन्मजात दोष,प्रसूती पश्चात बालमृत्यू मध्ये वाढ.अर्भक मृत्यू मधील वाढ.
मज्जासंस्थेतील होणारे विकार
मतीमंदपणा,मानसिक पंगूत्व
ग्रंथीदोषामुळे येणारा मतीमंदपणा
बुटकेपणा,खुजेपणा,मानसिक व शारीरिक दोष
नवजात :- नवजात गलगंड,नवजात हायपोथायराडीझम गलगंड
बालक :- बाल्यावस्थेतील हायपोथायराडीझम
प्रौढ :- मानसिक दुर्बलता,शारीरिक वाढ खुंटणे.
तरुण :- गलगंड व हायपोथायराडीझम,मानसिक दुर्बलता.
बालकांना मतिमंदत्व का येते ?
आईच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला त्याच्या मेंदूच्या व शरीराच्या सर्वसाधारण वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य प्रमाणात नियमित आयोडीनचा पुरवठा आवश्यक असतो. बाळाला फक्त आईच आवश्यक आयोडीनचा पुरवठा करू शकते. जर आईच्या शरीरामध्ये आयोडिनची कमतरता असेल तर गर्भाला सुद्धा आयोडिनचा पुरवठा होत नाही. जर आईच्या शरीरात आयोडिनची कमतरता जास्त प्रमाणात असेल तर बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ कायमस्वरूपी खुंटते आणि बाळ मतिमंद होतो.तसेच इतरांप्रमाणे बोलू चालू आणि विचार करू शकत नाही. जर आईच्या शरीरातील आयोडिनची कमतरता सौम्य प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम बाळावर होतो. आईच्या शरीरातील आयोडीन कमतरतेचा परिणाम बाळाच्या भावी आयुष्यात दिसून येतो.
भविष्यात अशा समस्या टाळता याव्यात म्हणून प्रत्येकांनी जेवणात आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा. आयोडीनयुक्त मिठ हे साधेच मीठ असते ज्यामध्ये आयोडीन हे संयुगाच्या स्वरूपात योग्य प्रमाणात मिसळलेले असते. आयोडिनयुक्त मीठ हे दिसायला,चवीला आणि वासाला नेहमीच्या साध्या मीठा प्रमाणेच असते. ते आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी प्रमाणे वापरू शकतो. हे मीठ अन्न शिजवताना तसेच फक्त खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो.
साधारणतः जवळपास 10 ग्राम एवढे मीठ रोज आहारात वापरले जाते. जर 15 पी.पी.एम. एवढे आयोडीनचे प्रमाण उपलब्ध असलेले आयोडिनयुक्त मीठ तयार करून बाजारात उपलब्ध करून दिले जात आहे.आयोडिनयुक्त मिठातील आयोडीन हे हवेतील उष्णता व दमटपणा यामुळे निघून जाते. म्हणून घरगुती वापराकरिता वापरले जाणारे आयोडिनयुक्त मीठ हे उष्णतेपासून लांब,हवाबंद आणि आर्द्रता विरहित बरणीमध्ये साठवून ठेवावे.
वाहतूकदार,घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा आयोडिनयुक्त मीठ वाहतूक करताना आणि साठवून ठेवताना त्याचा बाहेरील वातावरणाशी (जसे सूर्यप्रकाश आणि पाऊस) संपर्क येऊन त्यातील आयोडीन निघून जाणार नाही याची काळजी घ्यावयास हवी.आयोडिनयुक्त मिठ हे रोजच्या वापरात खूपच कमी लागते. जसे प्रत्येकाला 10 ग्रॅम, तर 5 जणांच्या कुटुंबाला 1.5 किलोग्रॅम एवढे मीठ लागते. हे लक्षात घेता आयोडीन न्यूनता विकार यापासून बचाव हा मोठा फायदा होण्यासाठी कुटुंबाला खूपच कमी किंमत मोजावी लागते.
आधी नमूद केल्याप्रमाणे भविष्यात माता आणि मुले यांच्यावर कोणतेही दूरगामी परिणाम होऊ नयेत म्हणून समाजातील प्रत्येक कुटुंबात आयोडीनयुक्त मिठाचाच वापर करावा.
डॉ.अजय डवले
प्राचार्य
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र
अमरावती