नवरात्र विशेष लेख :
( हा विज्ञाननिष्ठ लेख मनःपूर्वक वाचून संग्रहित ठेवावा व आपल्या मित्रांनाही पाठवावा )
*नवरात्र :*
*९ दुर्गा म्हणजे ९ दिव्यौषधी*
ले : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.
मोबाईल क्रमांक ९८८१३७३५८५
संदर्भासह सुस्पष्ट निरूपण
दुर्गा कवच
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
हे दुर्गा कवच ब्रह्मदेवाने मार्कंडेय ऋषींना दिले. मार्कंडेय ऋषी हे आयुर्वेद जाणणारे होते.
मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत ज्या ९ औषधी वनस्पतींना मानाचे स्थान आहे त्या ९ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला दिसतात. या वनस्पतींची माहिती आपण करून घेऊया.
*प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।*
*१. प्रथम नवदुर्गा : शैलपुत्री . शैलपुत्री म्हणजे हिरडा.*
हिरडा/हरडा ही एक दिव्य औषधी वनस्पती आहे.
पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे.
नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी ।। असे हिरड्याचे महत्त्व आहे.
हे झाड ५० ते ७५ फुटांपर्यंत वाढते. समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत व दाट वनातील महाबळेश्वर, कोयना तसेच मध्य प्रदेशातील नदीचा किनारा अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ४६ सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाच्या प्रदेशात हा वृक्ष चांगला वाढतो. तसेच पाण्याचा ताण असेल तरी हा वृक्ष सहन करू शकतो.
या झाडाची जुनी पाने डिसेंबर ते मार्च काळात गळून पडतात व नवीन पालवी तांबूस रंगाची लव असलेली येते. पाने ७.६ ते १७.८ सेंटीमीटर लांबीची व ३.८ ते ८.९ सेंटीमीटर रुंदीची असतात.
हिरड्याची फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. ही उग्र वासाची पांढरी पिवळी असतात.
औषधी म्हणून हिरड्याची फळे उपयुक्त असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येतात. फळे साधारण २.५ ते ३.३३ सें.मीटर लांब व ३.८ ते ८.९ सें.मिटर रुंदीची मध्यभागी फुगीर व ५ शिरा स्पष्ट दिसणारी पिवळट तपकिरी रंगाची गोलसर असतात.
हिरड्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत
१) हिरड्याचे फळ पक्व होण्यापूर्वी म्हणजेच त्यात बी निर्माण होण्यापूर्वी काही फळे झाडावरून पडतात त्याला बाळहरडा असे म्हणतात
२) हिरड्याचे फळ जे मोठे होते पण अपरिपक्व अवस्थेत वाढलेले असते त्याला चांभारी हिरडा असे म्हणतात . यामध्ये टॅनीन असते. याचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी होतो
३) जे फळ पूर्ण परिपक्व होते त्याला सुरवारी हिरडा म्हणतात. हे पाण्यात टाकले कि बुडते. वजनाला २० ग्रॅमपर्यंत असते. हे औषधी फळ होय.
हिरड्याचा आकार व रंग यावरून हिरड्याच्या अजून सात जाती आहेत.
विजया : या जातीची फळे तुंबडी सारखी गोल असतात व सर्व प्रकारच्या रोगावर उत्तम असतात.
पूतना : जातीचा हिरडा मोठा व पातळ असून तो लेप देण्यासाठी वापरतात.
अमृता : यातील बी बारीक,मांसल व भरलेली, रेचन देण्यास उपयुक्त असते.
रोहिणी : हे साधारण गोल फळ व्रणरोपक म्हणून वापरतात.
अभया: या हिरड्यावर पाच उभ्या रेषा ठळक असतात. हा नेत्र रोगावर वापरतात.
जीवंती : याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो व सर्व रोगावर उपयुक्त असतो.
चेतकी : याला पाच धारा असतात व चूर्ण करण्यास उपयुक्त असून हा हिरडा भाजून खातात.
हिरड्याचे औषधी म्हणून दात, हिरड्या, प्लिहा, खोकला ,आवाज बसणे, उचकी श्वासन, गर्भाशयासाठी बलदायी तसेच पचनसंस्थेत रेचक असे गुणधर्म आहेत. गर्भवती स्त्रीने हिरडा खाऊ नये.
त्रिफळा चूर्ण हे उपयुक्त औषध बनवण्यासाठी ३ भाग हिरडा, ७ भाग बेहडा व १२आवळा असे प्रमाण असते. हिरड्याच्या फुलांपासून उत्तम मध मिळतो. यामुळे या झाडावर मधमाशांचे प्रमाण खूप असते जे पर्यावरण रक्षणासाठी फारच उपकारक असते.
*२)द्वितीयं ब्रह्मचारिणी*
*द्वितीय नवदुर्गा : ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी वनस्पती-*
स्मरणशक्ती वाढविणारी ही वनस्पती असल्यामुळे हिला सरस्वती असेही म्हणतात. ब्राह्मीचे तेल प्रसिद्ध आहे. यामुळे शांत झोप लागते व केसांची वाढ उत्तम होते. अर्थातच शांत झोपेमुळेआपले आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मी रक्तदोषनाशक, स्वरयंत्राला पोषक असून पचनसंस्था व उत्सर्जन संस्थांना आरोग्यदायी आहे.
*३) तृतीयं चन्द्रघण्टेति ।।*
*तिसरी नवदुर्गा : चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर, हालीम, चमसूर, -*
हालीम ही शरीरास पोषक अशी अत्यंत दिव्य औषधी असून विटामिन सी, ए, इ, प्रोटीन्स,लोह,फायबर देणारी वनस्पती आहे. पालेभाजी म्हणूनही हिची ओळख आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, सांधेदुखी, हृदय विकार, रक्तशुद्धी, महिलांच्या मासिक पाळीचे विकार, दूध वाढविणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, अशा विविध गुणधर्मांनियुक्त अशी ही पालेभाजी आहे. जी पौष्टिक, कफनाशक, बलवृद्धी करणारी आहे. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात. या वनस्पतीच्या बिजास हलीम असेही म्हणतात. याचे लाडू बाळंतिणीला देतात. आजारी व्यक्तीला दिले जातात.
*४) कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।*
*चौथी नवदुर्गा : कुष्मांडा : कोहळा या वनस्पतीचे संस्कृत नाव कुष्मांडा असे आहे*
पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तांत रूपांतर होते. या प्रक्रियेत कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते. वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे. कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कुष्मांडा अर्थात कोहळा हे फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास वरील सर्व फायदे मिळतात.
*५) पंचमं स्कन्दमातेति।*
*पाचवी नवदुर्गा : स्कंदमाता. म्हणजेच अळशी / जवस वनस्पती*
अळशी अर्थात जवस ही वनस्पती महिलांच्या सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त अशी दिव्यौषधी आहे. यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, प्रोटीन्स, विटामिन सी, इ, के, बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, मॅंगनेजीयम फॉस्फरस, आयर्न असे अनेक घटक द्रव्य असून यामुळे आपल्या शरीराचे
वात, पित्त, कफ संतुलित होतात.
विशेष करून महिलांचे सर्व प्रकारचे विकार उदा. गर्भाशयातील गाठी, मासिक पाळीच्या समस्या, सांधेदुखी, पीसीओडी, चेहऱ्यावरील केस, सुरकुत्या, अशा व्याधींचा नाश जवस/ अळशी करते. अळशीमुळे एंड्रोजन हार्मोन्स कमी होतात. आळशी अँटिऑक्सिडंट, ऍंटीकॅन्सर आहे. नियमितपणे अळशी खाल्ल्यास वरील सर्व विकार नाहीसे होतात.
*६ ) षष्ठं कात्यायनीति च।*
*सहावी नवदुर्गा : कात्यायनी म्हणजे अंबाडी पालेभाजी -*
अंबाडीची पालेभाजी रक्तदाब नियंत्रित करते. शरीरातील चरबी कमी करते. लो कॅलरीज डायट म्हणून ही भाजी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन ई, लोह, झिंक हे डोळ्यांसाठी उपयुक्त असे घटक असतात. भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टीओपोरोसीसचा आजार होत नाही. अंबाडीची भाजी डियूरॅटीक द्रव्यांनी युक्त असते त्यामुळे लघवीची जळजळ, उन्हाळे यांवर उपकारी.
तथापि अंबाडीची भाजी ऑक्सेलिक ऍसिडयुक्त असल्यामुळे मुतखडा असणाऱ्यांनी, ऍसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये.
.पित्त, कफाचे तसेच गळ्याचे आजारांवर अंबाडीची भाजी उपकारक आहे .
*७) सप्तमं कालरात्रीति*
*सातवी नवदुर्गा : काळरात्री म्हणजेच नागदवणी वनस्पती-*
ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही अत्यंत थंड वनस्पती आहे. शरीरांतर्गत रक्तस्त्राव, बवासीर,मुळव्याध सारख्या विकारात या झाडाची पाने काळ्यामिरीसोबत खाल्याने रक्तस्त्राव थांबतो. शरीरावर आलेली सूज,अल्सर, आतड्यांचे विकारांवर गुणकारी.लघवीला होणारा त्रास, जळजळ, मुत्र विरोध अशा विकारात गुणकारी. या वनस्पतीची लागवड घराच्या सभोवती केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पानांचा चिक (दुध) विषनाशक आहे.
*८) महागौरीति चाष्टमम् ।।*
*आठवी नवदुर्गा : महागौरी म्हणजेच तुळस -*
तुळशीचे धार्मिक आणि पर्यावरण विषयक महात्म्य सर्वांनाच परिचित आहे. घरामध्ये सातत्याने सकारात्मक उर्जेची निर्मिती व वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते. तुळस अँटीकॅन्सर आहे.
विटामिन सी, झिंक, अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरस,मुत्रवर्धक, अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्यौषधी आहे. शरिरातील युरिक ऍसिड कमी झाले असल्यास तुळशीचा रस गुणकारी ठरतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा. सर्दी, पडसे, ताप, त्वचारोग, केसांची गळती, मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. रक्तवृद्धी, बलवृद्धी, हृदयाची मजबुती, मज्जा संस्था, स्मरणशक्ती अशा सर्वच बाबतीत तुळस अत्यंत गुणकारी आहे.
तुळशीचे विविध प्रकार आहेत तथापि सर्वच प्रकारची तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.
*९) नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।*
*नववी नवदुर्गा : सिद्धिदात्री ; शतावरी वनस्पती -*
शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे. शतावरी या शब्दातच शतावरी चे गुणविशेष आहेत. म्हणजे शेकडो फायदे ज्या वनस्पतीचे आहेत अशी वनस्पती म्हणजे शतावरी.
विशेषतः महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे.
शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. शतावरी हॅप्पी हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे चिडचिडेपणा व ताणतणाव दूर होतात. रक्ताभिसरण, दृष्टीदोष, हृदयाची मजबुती, श्वसनाचे विकार, दमा, पचनसंस्था, आतड्यातील कृमींचा नाश, भूक वाढविणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करणे, बद्धकोष्ठता, अतिसार, बवासीर, मुळव्याध, वजन कमी होणे, चरबी कमी करणे, मधुमेह, कोरडी त्वचा सतेज बनवणे, शरीरावरील फोड, मुरमे यांचा नाश करणे असे असंख्य फायदे शतावरीच्या सेवनाने होतात. अर्थात शतावरी हे शरीराचे कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली, वीर्यवान, सुडौल, निरोगी, चिरतारूण असे आरोग्य प्रदान करते. हृदयाला बळ देते.
नवरात्रीचा सण साजरा करीत असताना आपण मार्तंड पुराणातील या दुर्गा कवचाचा सखोल अभ्यास केला की आपल्याला समजते की कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, तसेच त्याचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे.
हा संस्कार/ संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रोत्सव. निसर्गाने आपल्याला भरघोस दिलेले आहे, आपल्या संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्व दिलेले आहे.
हे देवत्व कसे आहे ते वरील विवेचनावरून आपल्या निश्चितच लक्षात आले असेल. तेव्हा आपणही अजून सखोल अभ्यास करून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा विश्वशांतीचा मार्ग स्विकारावा. निसर्गाचे आशीर्वाद घ्यावेत. निसर्गाचे आशीर्वाद हेच देवाचे आशीर्वाद.
उदयोस्तू जगदंब🙏
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, पुणे.
निसर्गोपचारक व संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

