प्रतिनिधी । पिंपळे
पिंपळे खु., पिंपळे बु., चिमनपुरी, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे, अटाळे परिसरात गेल्या आठवडाभरा पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका लाखो रुपयांचा कापूस व मका पिकांना बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सततच्या पावसामुळे कापसावर ती मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसाच्या झाडांच्या मुळे सडू लागल्याने झाडे लालसर दिसू लागली आहेत. काही शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्यांचे कापूस पीक धोक्यात आले आहे. आतून नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत असून तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
याचबरोबर मक्याच्याही पिकाची गंभीर हानी झाली आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले असून मका आडवा पडू लागला आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभे केलेले पीक आता सततच्या पावसामुळे नाशाकडे वाटचाल करत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यंदा निसर्गाने पावसाचा वर्षाव भरभरून दिला पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.