राहाता प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट कोसळले आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, झेंडू फुलं, मका, बाजरी, कांदा आणि ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतल्याने सर्वत्र हतबलता पसरली आहे. अनेक ठिकाणी शेतजमीनच वाहून गेली असून पिके डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली आहेत.
शिर्डी शहरातील विविध भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांवर तर जगण्याचे संकट ओढावले आहे.
याचबरोबर, काही दिवसांपूर्वी नगर-मनमाड रोडवरील हॉटेल फाउंटन पार्कजवळील वड्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, तसेच त्या वड्याचे रुंदीकरण करून तिथे पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. नानासाहेब शिंदे पाटील यांनी पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
👉 “शेतकऱ्यांचे काढणीस आलेले पीक पावसामुळे पूर्णपणे नासले आहे. घरगुती वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदतीचे हात पुढे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी अर्जदार नानासाहेब शिंदे पाटील यांनी केली आहे.
००००

