मातृछत्र हरपले, पण साईंच्या चरणी गवसले जीवन; तब्बल ३३ वर्षे साईसेवा आणि समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या ‘संजूभाऊंना’ ५५ व्या वाढदिवसानिमित्त मानाचा मुजरा!
जिवेत शरद शतम् !
संघर्ष हाच ज्यांचा श्वास, समाजसेवा हेच ज्यांचे अंतिम ध्येय आणि साईसेवा हेच ज्यांचे जीवनधर्म… अशा शिर्डी नगरीतील प्रेरणादायी आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे आदरणीय संजय विठ्ठल महाजन साहेब — सर्वांच्या प्रेमाने ओळखले जाणारे ‘संजूभाऊ’!
आज दिनांक ९ मे रोजी त्यांचा ५५ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा होत असताना, त्यांच्या या खडतर, जिद्दी, प्रेरणादायी आणि सेवाभावी जीवनप्रवासाला उजाळा देताना शब्दांनाही एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा लाभते.
९ मे १९७१ रोजी धुळे जिल्ह्यातील न्याहळोद या गावी संजयजींचा जन्म झाला. मात्र नियतीने जन्मताच त्यांच्या आयुष्यावर दुःखाची सावली टाकली आणि आईचे मायेचे छत्र हरपले. पण म्हणतात ना — “ज्याचा कुणी नसतो, त्याचा देव असतो!”
लहानपणी कौटुंबिक आधार जरी हरपला, तरी शिर्डीच्या साईबाबांच्या रूपात त्यांना माय-बाप लाभले आणि याच साईचरणी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केले.
आज मागील तब्बल ३३ वर्षांपासून ते श्री साईबाबा संस्थान एम्पलॉइज सोसायटी, शिर्डी येथे प्रामाणिकपणे, निष्ठेने सेवा बजावत आहेत. ही प्रदीर्घ सेवा म्हणजे त्यांच्या अखंड तपश्चर्येची, निष्ठेची आणि सेवाभावाची जिवंत साक्ष आहे.
खेळाडूवृत्ती ते समाजसेवक : संघर्षातून घडलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व
संजयजींचा प्रवास कधीच सोपा नव्हता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संकटांनी त्यांची परीक्षा घेतली, पण त्यांनी प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. रनिंग मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी आपल्या लढाऊ वृत्तीचा ठसा उमटवला. त्या काळात मिळालेले स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र आजही त्यांच्या संघर्षशील जीवनप्रवासाच्या सुवर्ण आठवणी जपून आहेत.
स्वतः कितीही अडचणीत असले तरी इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे — हीच त्यांची खरी ओळख बनली. त्यामुळेच आज शिर्डी परिसरात “संजूभाऊ” हे नाव विश्वास, आपुलकी आणि मदतीचे प्रतीक बनले आहे.
पत्रकारिता आणि समाजकारणाचा सुरेख संगम
समाजातील वंचित, गोरगरीब आणि गरजू जनतेसाठी काहीतरी भरीव काम उभे करण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलीस मित्र संघटनेत कार्य सुरू केले. त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा देण्यासाठी त्यांनी ‘साईश्रद्धा प्रतिष्ठान, शिर्डी’ ची स्थापना केली. आज या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
समाजकारणासोबतच पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीचा वेगळाच दबदबा निर्माण केला. समाजातील प्रश्नांना न्याय देत, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करत त्यांनी पत्रकारितेचा सन्मान उंचावला. सध्या ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग सोशल मीडिया जिल्हा संयोजक म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.
याआधी त्यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष), ओबीसी मोर्चा राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख, पोलीस बॉईज संघटना अहिल्यानगर, बहुजन पत्रकार संघ, भारतीय पत्रकार संघ अशा अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर काम करत संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान दिले आहे.
मृत्यूच्या दाढेतून परतलेला ‘योद्धा’
कोरोनाच्या भीषण महामारीत जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना संजयजींना कोरोना आणि निमोनियाने गाठले. धुळे येथील जवाहर मेडिकलमध्ये तब्बल १६ ते १७ दिवस मृत्यूशी झुंज देत त्यांनी केवळ आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि साईबाबांच्या कृपेच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली.
संकटात खचून न जाता राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने समाजसेवेत स्वतःला झोकून दिले. त्यांची ही जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो!
“समाजाने आपल्यासाठी काय केले, यापेक्षा आपण समाज आणि देशासाठी काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचे आहे,” हा विचार संजूभाऊंनी केवळ शब्दांत नाही तर आपल्या कृतीतून जपला आहे. व्यक्ती मोठी असो वा छोटी, श्रीमंत असो वा गरीब — प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि मित्रत्वाने वागण्याचा त्यांचा मनमिळावू स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने ‘माणसांतील माणूस’ बनवतो.
आजवरच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, त्या प्रत्येकाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. “साईबाबांच्या आशीर्वादामुळेच मला सेवेत आनंद मिळतो,” असे ते आवर्जून सांगतात.
आज त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शिर्डी परिसरातून आणि असंख्य सहकाऱ्यांच्या मनातून एकच भावना व्यक्त होत आहे.
“अशा या ध्येयवेड्या, कार्यमग्न, साईभक्त आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो!”
साईबाबांच्या कृपेने त्यांचा सेवामय आणि प्रेरणादायी प्रवास असाच अखंड सुरू राहो…
त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभरच नव्हे तर संपूर्ण देशभर आणि जगभर पोहोचो…
हीच साईचरणी प्रार्थना!
आदरणीय संजय महाजन साहेब यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक आणि अनंत शुभेच्छा!
-लेखन आणि शब्दांकन
विशाल रायते
(पत्रकार, दै. सकाळ)

