दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर रोजी असते. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आई-वडिलांनंतर मुलाच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. पुस्तकातील धडे शिकविण्याबरोबरच चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, कर्तव्य- अधिकार आणि माणुसकीचा अर्थ समजावून सांगण्याचे काम शिक्षक करीत असतात. म्हणूनच शिक्षकाला राष्ट्रनिर्मितीचा शिल्पकार म्हटले जाते.
शिक्षक : विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक
प्रत्येक विद्यार्थी हा एका ंकोऱ्या कागदासारखा असतो. त्याच्यामध्ये अनेक शक्यता दडलेल्या असतात. त्या शक्यता ओळखून त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षक करतात. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असला, तरी त्याच्यातील कलागुण, क्रीडागुण, नेतृत्वगुण किंवा सर्जनशीलता शिक्षक ओळखू शकतात. त्यामुळे शिक्षक केवळ परीक्षेतील गुणांकडे न पाहता विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यास, करिअर आणि भविष्यातील अपेक्षांचे मोठे दडपण आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे, अपयशातून पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देणे आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनविणे ही शिक्षकांची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते.
बदलत्या काळातील शिक्षकाची भूमिका
तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल वर्ग आणि ऑनलाइन शिक्षणामुळे माहिती मिळविणे सहज शक्य झाले आहे. एका क्लिकवर जगभरातील माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. मात्र माहिती मिळणे आणि त्या माहितीचा योग्य वापर करण्याची विवेकबुद्धी विकसित होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. येथे शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा ंवापर ज्ञानासाठी करावा, त्याचे व्यसन बनू नये, सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती खरी नसते हे समजावे, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार करण्याची सवय लागावी, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
गुणांपेक्षा माणूस घडविणे महत्त्वाचे
शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ चांगले गुण मिळविणे किंवा मोठी नोकरी मिळविणे हा नसावा. चांगला नागरिक, संवेदनशील माणूस आणि जबाबदार व्यक्ती घडविणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, सहकार्य, समता, बंधुता, पर्यावरणाची जाणीव, संविधानिक मूल्यांचा आदर आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वर्गातील प्रत्येक धडा हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता जीवनाशी जोडला गेला पाहिजे.
शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा सन्मान
आज अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, पत्रकार, उद्योजक, कलाकार आणि समाजसेवक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचे मार्गदर्शन असते.
आपल्याला अक्षरांची ओळख करून देणाऱ्या पहिल्या शिक्षकापासून ते जीवनातील कठीण प्रसंगी योग्य मार्ग दाखविणाऱ्या मार्गदर्शकापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे योगदान अनमोल आहे. शिक्षकांनी दिलेले ज्ञान आणि संस्कार यांची किंमत कोणत्याही पुरस्काराने किंवा पैशाने मोजता येत नाही.
विद्यार्थ्यांनीही शिक्षकांप्रती कृतज्ञ राहावे
शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा, त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करावा आणि जीवनात प्रामाणिकपणे प्रगती करून शिक्षकांचे नाव उज्ज्वल करावे.
आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक, अधिकारी, शास्त्रज्ञ, उद्योजक किंवा समाजनेता असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी केला, तर शिक्षक दिनाच्या शुभेच्छांना खऱ्या अर्थाने सार्थकता प्राप्त होईल.
शिक्षक दिनाचा संदेश
शिक्षक हा फक्त वर्गात शिकवणारा व्यक्ती नसतो; तो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा, अडचणीच्या काळात आधार देणारा आणि भविष्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकांच्या हातात उद्याच्या पिढीचे भविष्य घडविण्याची ताकद असते.
म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक शिक्षकाच्या कार्याला मनापासून सलाम करणे आवश्यक आहे. ज्ञानाचा दिवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचविणाऱ्या या ज्ञानदूतांमुळेच समाज प्रगतिशील आणि राष्ट्र सक्षम बनते.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना पंख देणाऱ्या, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
“शिक्षक घडवतो विद्यार्थी, विद्यार्थी घडवतो समाज आणि समाज घडवतो राष्ट्र!”
-शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
*शौकतभाई शेख
प्रमुख:
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

