पालखी सोहळा समाज जीवनातील अमूल्य ठेवा –हर्षवर्धन पाटील
-पावसाची कमतरता दूर होईल
इंदापूर : प्रतिनिधी दि. 17/7/26
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व भक्तीची परंपरा असून, समाज जीवनातील अमूल्य ठेवा आहे. पंढरीकडे जाणारे पालखी सोहळे हे जगातील अद्वितीय असे प्रेरणादायी सोहळे आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) काढले.
हर्षवर्धन पाटील हे बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल सोहळ्यास उपस्थित होते. प्रसंगी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जगभर संतांची भूमी म्हणून ओळख आहे. या पवित्र भूमीतील पालखी सोहळे ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असून, संतांच्या विचारांचा प्रसार तसेच बंधुता, प्रेम आणि ऐकतेचा संदेश देण्याचे कार्य हे वारकरी संप्रदायाने अविरतपणे अनेक शतकांपासून करीत आहे.
सध्या राज्यावर पावसाच्या कमतरतेचे संकट आहे. खरिपाच्या पेरण्या सुमारे 50 टक्के एवढ्याच झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस होऊन शेती सुजलाम सुफलाम व्हावी तसेच प्रत्येकाचा संसार प्रपंच आनंदी राहावा तसेच समाजामध्ये आपुलकीची भावना कायम राहावी त्याचबरोबर वाढीस लागावी, अशी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना केल्याचे याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
या रिंगण सोहळा प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज जाचक आदी मान्यवरांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. यावेळी या नेत्यांनी एकमेकांशी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील व मान्यवर पायी चालत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.
__________________________
फोटो:-तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील बेलवाडी रिंगण सोहळ्याचा आनंद घेताना हर्षवर्धन पाटील.

