इंदापूर : प्रतिनिधी दि.8/7/26
सध्या जोरदार पावसामुळे भाटघर, वीर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्यातून ब्रिटिशकालीन शेटफळ हवेली, वाघाळा, वरकुटे खु. तलावामध्ये पाणी सोडून ते पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेटफळ हवेली व इंदापूर तालुक्यातील इतर तलाव भरून घेणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी मुख्य अभियंता संजीव चोपडे तसेच पुणे पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली. निरा देवधर, भाटघर धरण क्षेत्रामध्ये सध्या दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेटफळ हवेली तलाव पाण्याने भरून घेतल्यास बावडा व परिसरातील शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी(बा.), सराटी, लाखेवाडी आदी लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
तसेच सराफवाडी नजीकचा वाघाळा तलाव, वरकुटे खुर्द तलाव व पिण्याच्या पाण्यासाठीचा वालचंदनगर टॅंक तसेच घोलपवाडी येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा साठवण टॅंक हेही नीरा डावा कालव्यातील पाण्याने भरून घेण्यात यावेत. परिणामी, त्या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
____________________________
फोटो

